ताज्याघडामोडी

राज्याच्या सत्ता संघर्षाचा ‘निक्काल’ कधी?; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी तारीखच सांगितली

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच महत्त्वाचा नाही तर देशातील भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी ही मार्गदर्शक असाच ठरणारा असणार आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन महिना होत आला तरी अजून कोर्टाने निकाल दिलेला नाही. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्येही धाकधूक निर्माण झाली आहे. या निकालावर राज्यातील सत्ताकारणाचं भवितव्य ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकालाची तारीख अजून जाहीर केलेली नाही. मात्र, राज्यातील सत्तासंघर्षवर 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध वकील उज्जवल निकम यांनीही राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल हे आता जरी सांगणे कठीण असले तरी माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायाधीश निवृत्त होत असल्याने हा सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा आहे, असं उज्जव निकम म्हणाले.
निकम यांना राजकारणात येणार का? असा सवाल केला असता त्यांनी नाही असं म्हटलं. सध्यातरी माझा राजकारणात येण्याचा विचार नाही. कारण सध्या राजकारणात जी अस्थिरता आणि गढुळता आहे, ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तींनी राजकारणात येणं योग्य नाही, असं माझं मन सांगत आहे, असं निकम म्हणाले.
प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनीही सत्ता संघर्षावर भाष्य केलं आहे. येत्या 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येईल. 10 तारखेनंतर सत्तासंघर्षवर निकाल येण्याची शक्यता आहे, असं असीम सरोदे यांनीही म्हटलं होतं. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *