राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता एका चक्रीवादळामुळे राज्याला मोठा धोका असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबात पट्टा तयार झाल्यामुळे आज मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर पाहायला मिळेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मोचा चक्रीवादळामुळे ३ महत्त्वाच्या राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असून यामुळे पुढचे ४ दिवस मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळणार आहे. यावेळी हवामानात मोठा बदल होऊन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार आणि काही शहरांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह नजिकच्या शहरांमध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि धान्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.