राज्यात ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता मे महिनादेखील अवकाळी पावसाचा असेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज पहाटेपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण, या वेळेक अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई आणि उपगरांसह, पुणे, कोकण, गोव्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक शहरांमध्ये सोसाट्याचा वाराही सुटला आहे. दरम्यान, पुणे आणि आसपासच्या परिसरात आज गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी धान्याची विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आला आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
राज्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावमध्ये तुफान पाऊस झाला असून पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे २४ तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.