हरयाणाच्या करनालचे रहिवासी असलेल्या तरुण तरुणीचे मृतदेह उत्तर प्रदेशच्या मथुरेत रेल्वे रुळांवर सापडले. दोघे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह करनालला पाठवण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी तरुणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे.
उत्तम कॉलनीत राहणाऱ्या विवेकचे (१९) त्याच्या आजोबांच्या घराजवळ राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. तरुणी जगाधरीला गेली होती. ‘आम्ही तरुणीबद्दल विवेककडे विचारणा केली होती. मात्र आम्ही केवळ अभ्यासासंदर्भात एकमेकांशी बोलतो. आमच्यात प्रेमसंबंध नाहीत,’ असं विवेकच्या कुटुंबीयांनी सांगितलं. २७ एप्रिलला विवेक घरातून निघून गेला. दुसरीकडे जगाधरीला गेलेली तरुणीदेखील बेपत्ता झाली. दरम्यान विवेकच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबाला धमकी दिली. विवेक सापडला नाही, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी मुलीच्या कुटुंबाला देण्यात आली.
विवेक अंबालाला गेल्याची माहिती तपासातून उघडकीस आली. तरुणीदेखील जगाधरीहून अंबालाला आली. त्यानंतर दोघे ऋषिकेशला गेले. तिथे त्यांनी लग्न केलं. २९ एप्रिलला दोघे मथुरेला आले. रात्रीच्या सुमारास विवेकच्या अपघाताची माहिती पोलिसांकडून विवेकच्या कुटुंबीयांना मिळाली. पोलिसांनी आम्हाला तरुणीचा मृतदेह दाखवला नाही, असा आरोप त्यांनी केला. शवविच्छेदनानंतर विवेकचा मृतदेह करनालला नेण्यात आला. तिथे अंत्यविधी करण्यात आले.
तरुणीच्या कुटुंबीयांनी विवेकची हत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विवेकच्या अकाली मृत्यूनं कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. सुरुवातीला दोन्ही कुटुंबीयांनी दोघांचा एकत्र शोध घेण्याचं ठरवलं होतं. मात्र विवेकचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी मुलीच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.