कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे. याच वादातून पतीनं पत्नीला संपवलं. घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ माजली.
वाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नवनीत नगर येथे राहणारं सरोदे दाम्पत्य गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या मुलासह बालपांडे यांच्या घरी भाड्यानं राहत होतं. पती मनोज सरोदे (वय ५०), मृत पत्नी माधुरी मनोज सरोदे आणि १२ वर्षांचा मुलगा घरात वास्तव्यास होते. सरोदे दाम्पत्याला दोन मुलं असल्याची माहिती आहे. मोठी मुलगी १८ वर्षांची असून ती वर्ध्यात नातेवाईकांकडे राहते.
मनोज सरोदे हा एमआयडीसीत केबल कंपनीत मजूर म्हणून काम करतो. पती-पत्नीमध्ये पूर्वीपासूनच अनेकदा भांडणं होत असल्याचं समोर आलं आहे. पण स्थानिकांनी त्यांच्या भांडणाचा आवाज कधीच ऐकला नव्हता. गुरुवारी रात्री पती-पत्नीमध्ये कडाक्याचा वाद झाला. पतीने पत्नीच्या डोक्यात कुकरने, तर तोंडावर आणि पोटावर चाकूने वार करून खून खून केला.
घटना घडली तेव्हा घरात फक्त आरोपी आणि त्याची पत्नी उपस्थित होते. परीक्षा सुरू असल्यानं मोठी मुलगी आर्वी येथे गेली होती, तर मुलगा शेजारी राहणाऱ्या आपल्या मावशीच्या घरी झोपायला गेला होता. मृत महिलेची बहिणही जवळच नवनीत नगरमध्ये राहत होती. त्यांचा मुलगा हा रात्री मावशीच्या घरी थांबला होता. शुक्रवारी सकाळी मुलगा घरी परतला तेव्हा त्याला त्याच्या आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मुलगा घाबरला आणि रडायला लागला. शेजाऱ्यांनी घटनास्थळी येऊन महिला मृतावस्थेत असल्याचे पाहिले आणि लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपी पती पत्नीचा खून करून घटनास्थळावरून फरार झाला आहे.