ताज्याघडामोडी

आई, माझ्या निलला न्याय देजो…; विवाहितेने संपविले जीवन

जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरेचा २१ मार्च २०१६ ला नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर याच्यासोबत विवाह झाला होता. जुनी महानगरपालिका, मेन रोड येथे सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय हिरावाडी येथे राहावयास गेले. त्यांना निलराज हा मुलगा झाला. कोमलची सासू किरकोळ कारणावरून कोमल आणि तिची देरानी मीनाक्षी यांच्याशी वाद घालत असल्याने काही दिवसांनी दोघी वेगवेगळ्या ठिकाणी रहायला गेल्या.

गेल्या सहा महिन्यांपासून कोमल ही पती अभिजीत आणि मुलगा निलराज असे तिघे चिंतामणी नगर, पंचवटी येथे भाड्याच्या घरात राहायला आले होते. कोमलने स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू करून सर्व संसारोपयोगी साहित्यही खरेदी केले. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोमलची आई मंगलाबाई देवरे या थायरॉइडच्या उपचारासाठी नाशिकला गेल्या होत्या. कोमलची देरानी मिनाक्षीचे पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी गेल्याचे तिने आईला सांगितले. १ जानेवारी २०२३ रोजी कोमलची आई घरी परतली. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी जुन्या घराची दुरुस्ती केली असून ते सर्व तिकडे राहायला जात असल्याचे तिला जेठानी मेघाने सांगितले. कोमलनेही पती अभिजीत यांना आपण तिकडे राहायला जाऊ, असे सांगितले. पण मला तिकडे राहायचे नाही. मला ते घर पण नको, असे तिचे पती अभिजीत बोलले.

कोमल स्वतः सासू भारती यांच्याकडे गेली आणि आम्हालाही घरात राहू द्या, अशी विनंती केली. पण सासूने नकार दिला. सासूने नकार दिल्याने संपत्तीत मुलगा निलराज याचेही नाव घ्यावे, अशी मागणी कोमलने सासूकडे केली. यानंतर त्यांच्यात वाद झाला. सर्व प्रकार कोमलने मामसासरे ईश्वर चौधरी यांना कळविला. त्यांनी कोमलच्या सासरच्या मंडळींना याबाबत विचारणा केली. यामुळे सर्वांना कोमलचा राग आला. त्यांनी कोमलचा छळ सुरू केला. तू प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असशील तर मी तुला घटस्फोट देऊन माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल, अशी धमकी पती अभिजीतने तिला दिली. तसेच कोमलच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देणे सुरू केले. घडत असलेला सर्व प्रकार कोमलने आई मंगलाबाई व भाऊ कमलेश देवरे याला कळविला होता.

कोमल ताणतणावात असल्याने तिला माहेरच्या मंडळींनी समजावले होते. अभिजीतने कमलेशला घरातील वादविवाद वाढत असल्याने नाशिक येथे भेटण्यासाठी बोलाविले असता कामात असल्याने ३० जानेवारीनंतर आम्ही नाशिक येथे येतो, असे सांगितले होते. २७ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता कोमलने आईला फोन करून केला. माझी सासू, जेठ, जेठाणी, दिर हे मला धमकावत आहेत. तुमची मिटिंग होऊ देणार नाही, असे सांगत आहेत. तुला तुझा हक्क मिळू देणार नाही, असे म्हणत आहेत. नवरा साथ देत नाही. मला काही न्याय मिळणार नाही, असे बोलून तिने फोन कट केला. कोमलच्या आईने त्यानंतर अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही.

एका अनोळखी क्रमांकावरून कोमलच्या आईला ११.३० वाजता फोन आला. कोमलला उलट्या होत आहेत, असे एका अनोळखी महिलेने सांगताच कोमलने फोन घेतला आणि ‘आई आई माझ्या निलला न्याय देजो’ असे बोलून फोन कट झाला. कोमलच्या आईने जावई अभिजीतला फोन केला. मी त्र्यंबकला आहे. आई, दादा, वहिनी कोमलला पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने पुन्हा फोन केला. कोमलला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून ती आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. कोमलची आई व वडिलांनी रेल्वेने रात्री नाशिक गाठले. तिने विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे ९ वाजता डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *