आसाममध्ये एका दाम्पत्याने आपल्या अपत्य नसलेल्या मुलीला बाळ देण्यासाठी एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याशिवाय त्यांच्या मुलाला आणि आणखी एकाला अटक केली आहे. आपल्या निपुत्रिक मुलीला अपत्य प्राप्त व्हावं म्हणून या दाम्पत्याने एका महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. या दाम्पत्याची मुलगी हिमाचल प्रदेशमध्ये राहते, तिला खूप दिवसांपासून मूलबाळ होत नव्हतं. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
सिमलुगुरी पोलिसांनी एका महिलेची हत्या आणि तिच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चरईदेव जिल्ह्यातील राजाबारी टी इस्टेटमधील एका नाल्यात महिलेचा मृतदेह सापडला होता. केंदुगुरी बैलुंग गावातील नीतुमोनी लुखुराखॉन असे या महिलेचे नाव आहे. तसेच, सूत्रांनी सांगितले की, नीतुमोनी सोमवारी संध्याकाळी सिमलुगुरी टाउन मार्केटला जात असताना तिच्या दहा महिन्यांच्या मुलासह बेपत्ता झाल्या होत्या. सिमलुगुरी, शिवसागर, चराईदेव आणि जोरहाटच्या पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून मुलाला ताब्यात घेतले.
मुलाला हिमाचल प्रदेशात नेण्यात येणार होते, अशी माहिती पोलिसांनी. एका गुप्त माहितीवरुन कारवाई करत सिमालुगुरी पोलिसांनी मंगळवारी टेंगापुखुरी येथील सिष्ठा गोगोई उर्फ हिरामाई नावाच्या महिलेला आणि तिचा पती बसंत गोगोई यांना सिमालुगुरी रेल्वे जंक्शन येथून अटक केली. बुधवारी पोलिसांनी या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून हिरामाई यांचा मुलगा प्रशांत गोगोई आणि नितुमोनी लुखुराखॉनची आई बॉबी लुखुराखॉन या दोघांना अटक केली.
नितुमोनीच्या बहिणीने यापूर्वी पोलिसांना सांगितले होते की, तिला तिच्या बहिणीचे अपहरण आणि हत्येसाठी हिरामाई गोगोईवर संशय आहे. तिच्या तक्रारीवर कारवाई करत, पोलिसांनी हिरामाई आणि तिचा पती बसंत गोगोई यांना सिमालुगुरी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता मृताच्या बहिणीचा संशय बरोबर असल्याचे आढळले. पोलिसांनी सांगितले की, “या कुटुंबाने नितूमोनी आणि तिच्या बाळाचं अपहरण केलं, त्यानंतर त्यांना ते बाळ हिमाचल प्रदेशात आपल्या मुलीकडे पाठवायचं होतं. जेव्हा या दाम्पत्याला अटक झाली तोपर्यंत त्यांचा मुलगा त्या बाळासह ट्रेनने निघाला होता.