दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण या दोन्ही परीक्षांच्या नियमात दोन बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यंदा 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी (2023) फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानंतर आता बोर्डाने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. परीक्षार्थिंच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत.
पहिला बदल आहे की बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या वर्षातील (2023) परीक्षांवेळी त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही. तर दुसरा बदल आहे की, कोरोना काळात जो 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता, तो रद्द करण्यात आला आहे. म्हणजे आता कोरोनापूर्व नियमावली पुन्हा लागू करण्यात येणार आहे.
‘कोरोना साथरोगावेळी परीक्षार्थिंना ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा देण्यात आली होती. तसेच 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. आता कोरोनाचा धोका कमी झाले असून जुने नियम परत आणत आहोत’, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.