ताज्याघडामोडी

‘भीमा’च्या निवडणुकीत अखेर ‘वाटपास्त्र’ बाहेर निघाल्याची चर्चा

महाडिक यांचे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय अस्तित्व पणाला

तर पाटील-परिचारकांची प्रतिष्ठा पणाला 

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंढरपूर -मोहोळ -मंगळवेढा या तीन तालुक्याच्या कार्यक्षेत्रात मागील काही दिवस जोरदार आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.भीमा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापने पासून सुरुवातीची १४ वर्षे सोडली तर प्रत्येक भीमाच्या प्रत्येक निवडणुकीत महाडिक विरुद्ध राजन पाटील -परिचारक अशी लढत होताना दिसून आली.भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षांपासून महाडिक यांनी मोहोळ तालुक्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावण्यास सुरुवात केली.मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत महाडिक गट सक्रिय राहिला,तालुक्यातील राजन पाटील विरोधकांची मोट बांधण्यात महाडिक यांनीही प्रभावी भूमिका बजावत तालुक्यातील सत्ता स्थानात या विरोधी गटाने प्रभावी भूमिका बजावली.     

    मात्र याच वेळी पंढरपूर तालुक्याचा बहुतांश पूर्व भाग भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोडत असतानाही महाडिक गटाने या ठिकाणी विठ्ठल परिवारासोबत हातमिळवणी करीत पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल  परिवाराचा नेता हाच या तालुक्यातील भीमा परिवाराचा नेता म्हणून ओळखला गेला.२०११ मध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराचे नेते स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी अतिशय खंबीरपणे भूमिका बजावत २०११ च्या भीमाच्या निवडणुकीत सत्तांतर घडविण्यात मोठी भूमिका बजावली आणि महाडिक परिवाराचे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पुनश्च आगमन झाले होते.तर पंढरपूर तालुकाच नाही तर शहरातील भालके समर्थकांमध्ये मुन्ना महाडिक या नावाची मोठी क्रेझ निर्माण झाल्याचे दिसून आले.       

     डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिकेच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार मैदानात उतरवले.त्यावेळी धनंजय महाडिक यांचाही फोटो या आघाडीच्या बॅनरवर आघाडीचे नेते म्हणून झळकत होता.नगर पालिका निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आणि स्व.भारतनाना भालके हे गंभीर आजारी पडले.त्यांना प्रचार फेऱ्या- प्रचार बैठकांपासून लांब रहावे लागले.मात्र याच वेळी भीमाचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी पंढरपूर नगर पालिका निवणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि आघाडीतील इतर नेत्यांशी समन्वय साधत जोरदार व्यूहरचना केली होती.प्रचाराची शेवटची सभा शिवतीर्थ येथे घेण्यात आली आणि त्या निवडणुकीत परिचारक समर्थकांची २० वर्षाची सत्ता उलथवून लावण्यात स्व.भारतनाना भालके,धनंजय महाडिक आणि कल्याणराव काळे यशस्वी ठरले होते.       

      मात्र या निवणुकीनंतर भीमाचे चेअरमन धनंजय महाडिक हे पंढरपूर शहर असो अथवा तालुक्याच्या राजकारणात फारसे कुठे सक्रिय दिसले नाहीत.२०१६ ची भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक महाडिक प्रणित पॅनलने ४८०० इतक्या मोठ्या मताधिक्याने जिंकली.पुढे २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणुकीत मोहोळ तालुक्यात राजन पाटील विरोधी आघाडी म्हणून महाडिक-डोंगरे एकत्र आले.त्यांना राजन पाटील विरोधक येऊन मिळाले आणि मोहोळ तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा गट बलिष्ठ झाला.      आता भीमा सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत मोहोळ तालुक्यातील हाच राजन पाटील विरोधक म्हणून एकवटलेला गट खा.धनंजय महाडिक यांची भीमा सहकारी साखर कारखान्यावरील सत्ता अबाधित रहावी म्हणून जोरदार प्रचार करताना दिसून आला.आज भीमा सहकारी साखर कारखान्याचे मालक म्हणून ओळखले जाणारे सभासद आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.काही मालकांची मते विकत घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजुंनी होतोय अशी चर्चाही रंगली,’वाटप’ सुरु झाले अशा पोस्टही सोशल मीडियावर फिरू लागल्या.मात्र पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा या साऱ्या प्रकारापासून ‘अनिभिद्न्यच’ असल्याचे दिसून आले.   

‘भीमा’ च्या याही निवडणुकीत २०११-१६ प्रमाणे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवार सोबत राहणार का अशी चर्चा सुरुवातीला होताना दिसून आली.नुकत्याच पार पडलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवाराचे त्रिभाजन झाले.विठ्ठल चे चेअरमन अभिजित पाटील समर्थक विठ्ठल परिवार,युवराज पाटील समर्थक विठ्ठल परिवार आणि स्व.भारतनाना भालके समर्थक विठ्ठल परिवार असे तीन गट या विठ्ठल परिवारात तूर्तास तरी दिसून आले.यातील अभिजित पाटील आणि भालके समर्थक गटाचे प्रमुख नेते भीमाच्या प्रचारात महाडिक यांच्या बाजूने सहभागी झाले.युवराज पाटील यांनी मात्र आपली भूमिका अखेरपर्यंत उघडपणे तरी व्यक्त केली नसल्याचे दिसून आले.आणि यामागे परिचारक -युवराज पाटील यांच्यातील सख्य करणीभूत असावे अशीही चर्चा होताना दिसून आली.परंतु पारंपरिक गावगाड्याच्या राजकारणातील विरोधाची हि निवडणूक असल्याने विठ्ठल परिवारातील बहुतांश गावनेते यात सहभागी झाल्याचे दिसून आले.  

या निवडणुकीत परिचारक -पाटील पॅनल बाजी मारणार कि महाडिक पॅनल बाजी मारणार याच्या गावगाड्यात शर्यतीही लागल्या असल्याची चर्चा आहे.मात्र या निवडणुकीत जर परिचारक – पाटील पॅनल पराभूत झाले तरी त्यांनी हा कारखाना ११ वर्षांपूर्वीच गमावला असल्याने त्यांना नव्याने फारसा फरक पडणार नाही,तिकडे राजन पाटलांच्या दिमतीला लोकनेते कारखाना आहे तर इकडे परिचारक यांच्याकडे युटोपियन आहे.परंतु महाडिक यांनी भीमा गमावला तर मात्र मोहोळ तालुक्याच्या राजकारणात केवळ महाडिक गट शिल्लक राहणार आहे,आणि राजकीय बलस्थान असलेला कारखाना ताब्यात नसल्याने अस्तित्व पणाला लागणार आहे.     

  त्यामुळेच भीमा सहकारी साखर कारखान्याची हि निवडणूक हि जरी सहकारी संस्थेची असली,राजकारणाशी त्याचा वरवरचा संबंध नसला तरी सोलापूर जिल्हयाच्या राजकारणावर मोठा परिणाम टाकणारी आहे.त्यामुळेच हि निवडणूक जिकायचीच  हा निर्धार करून दोन्ही परस्पर विरोधी गट दिमतीला ‘वाटप’ घेऊन उतरले आहेत असेच म्हणावे लागेल. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *