शिक्षणाबरोबरच संस्कृतीचे महत्व जपले पाहिजे -माजी विद्यार्थी धनुर्धर अर्जुनदास
‘आपण आध्यात्मिकते सोबतच लॉजीकली विचार केला पाहिजे कारण शिक्षण आणि संस्कृती या दोन्ही बाबींचा समन्वय असला पाहिजे. यासाठी केवळ अंगी असलेली कौशल्ये पुरेशी नाहीत, तर त्यांची कृतीतून अंमलबजावणी झाली पाहिजे त्यामुळे शिक्षण आणि संस्कृतीचे महत्व अधिक वाढते आणि विकास होण्यास सुरवात होते त्यामुळे शिक्षणाबरोबरच संस्कृतीचे महत्व जपले पाहिजे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी धनुर्धर अर्जुनदास यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या ‘ऑलम्पस २०२२‘ या तंत्रज्ञानावर आधारित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी धनुर्धर अर्जुनदास हे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी ‘ऑलम्पस २के२२’ च्या खजिनदार जान्हवी देवडीकर यांनी स्पर्धेसाठी बाहेरून आलेले स्पर्धक व ‘ऑलम्पस २के२२’ या संशोधनात्मक स्पर्धेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी टीसीएस पुणे या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत असलेले स्वेरीचे माजी विद्यार्थी नागेश रोंगे म्हणाले की, ‘ऑलम्पस या स्पर्धात्मक कार्यक्रमामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतात.‘ स्वेरीच्या माजी विद्यार्थी असोसिएशन चे उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रय घोडके म्हणाले की, ‘वैयक्तिक कामगिरी ही महत्वाची असतेच परंतु केलेल्या सांघिक सादरीकरणामुळे व्यक्ती कौशल्यांना अधिक महत्व प्राप्त होते.’ यावेळी ए.जी.पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी वरुण उत्तम म्हणाले कि, ‘ऑलम्पस २ के २२’मुळे आम्हा स्पर्धकांच्या व्यक्तिमत्त्वात तसेच आत्मविश्वासात वाढ झाली आहे.’ वालचंद अभियांत्रिकीच्या भाग्यश्री नेतळकर म्हणाल्या कि, ‘ स्वेरीतील व्यवस्थापनाने व सर्व आयोजकांनी सर्व आवश्यक सोयी- सुविधा व्यवस्थितपणे पुरविल्या, यात कुठेही कमतरता आढळली नाही. अशी अदभूत सोय आणि कॅम्पस मधील संस्कृती विशेष उल्लेखनीय आहे, हे जाणवले. एकूणच कार्यक्रमाचे नियोजन उत्तम होते. त्यामुळे आम्हा बाहेरील महाविद्यालयांतून आलेल्या स्पर्धकांना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळेच स्पर्धेत आम्ही हिरीरीने सहभाग घेतला. स्पर्धेचा सराव करताना स्वेरीतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी खूप सहकार्य केले.‘ या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास २० महाविद्यालयांतील सुमारे ५०० हून अधिक स्पर्धकांनी २१ स्पर्धा प्रकारात सहभाग घेतला होता तर स्वेरीतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यापैकी बाहेरील विद्यार्थ्यांना स्पर्धेत अधिकाधिक प्राधान्य देवून जवळपास एक लाख रुपयांची बक्षिसे तसेच स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे वितरीत केली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, ‘ऑलम्पस २ के २२’ चे समन्वयक प्रा. डी. टी. काशीद, ऑलम्पसचे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीपराज साळुंखे यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस कुलकर्णी यांनी मानले.