ताज्याघडामोडी

“राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार जिंकणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपाने पक्के नियोजन केले आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार करणार नाही. सहाव्या जागेवरुन आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भाजपचे धनंजय महाडिक हे १०० टक्के निवडून येणार आणि आघाडीतील एक मोठा नेता पडणार. तेव्हा महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करुन त्यांच्यातील एकाची उमेदवारी मागे घ्यावी”, असे खळबळजनक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

भाजपतर्फे कोल्हापुरात, पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर टाहो मोर्चा काढला होता. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. भाजप कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माणिक पाटील चुयेकर, भगवान काटे आदींचा मोर्चात सहभाग होता.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीचा भोंगळ कारभार सुरू आहे. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई नाही. पूरस्थिती उदभवल्यास तयारी नाही. महाविकास आघाडी सरकारला लोकांच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही. महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेतही भाजप दिसतोय. ते सत्तेसाठी आपआपसात भांडतील. मात्र सरकारमधून बाहेर पडण्याचे धारिष्ट्य दाखविणार नाहीत.सरकार पडणार नाही. कारण त्यांना पक्के माहित आहे की, एकदा का हे सरकार पडले तर पुन्हा भाजपच सत्तेवर येणार आहे. सत्तेवर आलो की हिशेब चुकता करू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *