लग्नात कधीही क्षुल्लक कारणावरून लग्नात वाद होणं हे खरंतर नवीन नाही. वास्तविक विघ्नाशिवाय लग्नाला मजा नाही असं म्हटलं जातं. पण, हा वाद जर बाचाबाचीवर आला तर मात्र भलतंच काहीतरी घडू शकतं. याचा प्रत्यय मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात घडलेल्या एका लग्नात आला आहे.
धार जिल्ह्यातील धामनोद तालुक्यातील मांगबयडा गावात ही घटना घडली आहे. या गावात धार गावातून वरात आली होती. हे लग्न एका आदिवासी कुटुंबात होत होतं. वरात दारात आली तेव्हा नवरा मुलगा असलेल्या सुंदरलालने शेरवानी घातल्याचं लक्षात आलं.
त्याच्या शेरवानीमुळे वाद सुरू झाला. कारण, आदिवासी परंपरेनुसार विवाहप्रसंगावेळी धोतर आणि सदरा घालणं अपेक्षित होतं. पण, सुंदरलाल शेरवानी घालून आल्याने नवऱ्या मुलीच्या कुटुंबाने आक्षेप घेतला.
तरीही सुंदरलालने वधुपक्षाला न जुमानता ती शेरवानी बदलली नाही. तो तसाच विधींसाठी लग्नमंडपात पोहोचला. तेव्हा नवऱ्या मुलाच्या काकीने त्यावर आक्षेप घेतला आणि पुन्हा त्याला कपडे बदलण्यासाठी सांगितलं. पण वरपक्ष शेरवानीवर अडून बसला की याच कपड्यात तो विधी पार पडेल. या मुद्द्यावरून वाद वाढला.
वाद वाढल्याने दोन्ही पक्षांमध्ये मारहाण सुरू झाली. वधुपक्षाने वरपक्षाला दगड मारायला सुरुवात केली. त्यामुळे निम्मे वऱ्हाडी पळून गेले. उर्वरित वऱ्हाडींची वधुपक्षाने धुलाई करायला सुरू केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण थांबवलं. दोन्ही पक्षांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.