गुजरातमधील खंभात येथे रामनवमी दिवशी हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने विदेशात कट रचून हा हिंसाचार घडवून आणण्यात आला असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागले आहेत.
आणंद जिल्हा पोलीस अधीक्षक अजित राजिया यांनी या हिंसाचाराच्या तपासाबाबत महत्त्वाचा तपशील दिला आहे. हिंसाचार घडवण्यासाठी खंभात येथे बाहेरून माणसं बोलावण्यात आली. रामनवमीनिमित्त रविवारी शोभायात्रा निघणार होती. त्याआधीच शनिवारी हिंसाचार घडवण्याची सारी तयारी करण्यात आली. दगड आणि घातक वस्तू हल्लेखोरांना पुरवण्यात आल्या.
प्रत्यक्ष हिंसाचार सुरू झाल्यानंतर हल्लेखोरांनी दगडफेक आणि जाळपोळीसाठी इतरांनाही चिथावणी दिली, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. या हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवण्यात आला. विदेशात हा कट रचण्यात आला. मौलवी मुस्तकीम, त्याचे दोन साथीदार मतीन व मोहसीन तसेच रझाक अयूब, हुसेन हशमशा दीवाण हे या कटात सहभागी होते, असे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
शोभायात्रा मशिदीजवळून जात असताना दगडफेक व जाळपोळ करा, अशा सूचना आरोपींना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही कृती केल्याचेही पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. हिंसाचाराच्या आरोपाखाली पकडले गेलात तरी आम्ही तुमच्या पाठिशी राहू.
तुम्हाला कायदेशीर मदत पुरवू, असेही हल्लेखोरांना सांगितले गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींचे मोबाइल फोन आणि डेटा तपासला असून हा हल्ला पूर्वनियोजित होता हे त्यातून स्पष्ट झाले आहे. हिंदू समाजाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने शोभायात्रेवर हल्ला करण्याचा कट रचला गेला होता असेही तपासात आढळल्याचा दावा पोलिसांनी केला.