महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असं विधान काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात केतकरांनी आपली भीती व्यक्त केली.
महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भीती वाटते का असा प्रश्न चर्चेवेळी केतकरांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं.
याच कार्यक्रमात भाजपचे नेते प्रकाश जावडेकर देखील होते. त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की भाजप उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहात का?
या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, सध्या महाविकास आघाडीकडे कागदावर बहुमत आहे. त्यांच्यात जर काही असंतोष असेल तर तेच स्वतः पडतील. त्यांचं सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीच केलं नाही.
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य केलं जात आहे असा देखील आरोप आहे, त्यावर काय सांगाल असं विचारले असता जावडेकर म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे आहेत असा आरोप करणं चुकीचं आहे, त्या यंत्रणांना आम्ही सांगितलं नाही किंवा ते कुणाच्या ऐकण्यात नसतात.
पण कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नांबद्दल पारदर्शक असाल, आयकर भरत असाल तर तुम्हाला कसलीही भीती असणार नाही.