सध्या सोशल मीडियावर २००, ५०० आणि २००० आणि इतर नोटांबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. या नोटांवर काही लिहिलं असल्यास त्या चलनातून बाद होतील असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. आता हा मेसेज खोटा असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेकर पीआयबीने सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजमधील दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. खोट्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की आरबीआयच्या नव्या गाइडलाइन्सनुसार, नव्या नोटांवर काहीही लिहिलं असल्यास त्या नोटा चलनातून बाद होतील.
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांवर काहीही लिहू नये असं आवाहन केलं आहे. नोटांवर लिहिल्याने त्या खराब होतात आणि त्यांचा कालावधी कमी होतो. पण त्या चलनातून बाद केल्या जात नाहीत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असं म्हटलंय, की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, नव्या नोटांवर काहीही लिहिल्यास त्या नोटा अमान्य होतील आणि त्या कायदेशीर राहणार नाहीत.
मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत माहिती देत, पेनाने लिहिलेल्या चलनी नोटा अमान्य ठरणार नाहीत. तसंच त्या कायदेशीर राहतील असं म्हटलं आहे.