Uncategorized

वारकरी,फडकरी दिंडी समाज संघटनेने केली नव्या अध्यक्षांची निवड

जय हरी महाराज,अभिनंदन आणि अपेक्षा !     

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा संप्रादायिक वारसा सर्मथपणे पुढे नेणारे हभप संजय महाराज देहूकर यांची वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक

अभिनंदन
ह.भ.प.संजय महाराज देहुकर यांच्या गुरु गादीचा जसा मी आज स्वतःला सेवक समजतो तसे माझ्या मागील अनेक पिढ्या संत तुकाराम मंदिरात होणाऱ्या सप्त्यात अश्विन शुद्ध षष्ठीला कीर्तनाचा मान माझ्या आदीच्या पिढ्याना प्राप्त झाला.आणि माझ्या स्व.वडीलाचे बोट धरून मी लहानपणापासून या कीतर्न सेवेस उपस्थित रहात आलो तर काल्याच्या दिवशीचा शिधा सामग्रीचा मान हि आमच्याच परिवाराला होता.तेव्हापासून अतिशय मितभाषी आणि विन्रम स्वभाव असलेल्या हभप संजय महाराज यांना मी ओळखत आलो आहे.
वारकरी सांप्रदायाचा कळस संत शिरोमणी तुकोबाराय यांचा वारसा प्राप्त झालेल्या,प्रसिद्धी पासून दूर रहात संप्रदायाची सेवा करत आलेल्या हभप संजय महाराज यांच्या कडे वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्षपद सोपविण्यात आले हि व्यक्तिगत माझ्या परिवारासाठी अतिशय अभिमान आणि समाधानाची बाब आहे.
पण मला या निमित्ताने एक पत्रकार म्हणून नूतन अध्यक्षांना एक विनंती जरूर करावीशी वाटते.भूवैकुंठ अशी ओळख असलेली हि संताची भूमी म्हणजे अध्यात्मिक राजधानी आहे.आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी या बिरुदावलीचे उगमस्थान आहे.वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना म्हणजे समस्त विठ्ठल भक्तांचा मेळा आहे.त्यामुळे उगीचच बड्या नेत्यांसोबत फोटोसेशन करीत सोशल मीडिया मॅनेजमेंट,वारकरी आणि पंढरीच्या मूळ प्रश्नांना कुणी तरी निर्णय प्रकियेतील नेता,अधिकारी,पदाधिकारी नाराज होऊन बाळगण्यात येणारे मौन याचा अनेकवेळा अनुभव पंढरपूरकरांनी आणि समस्त भाविकांनीही घेतला आहे.कंबरेला उपरणे बांधून जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत सुरु केलेले कीर्तन जसे समाजातील वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवते .तसेच नियंत्रण या महत्वपूर्ण संघटनेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून आपण भूवैकुंठात घडणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या व येथे येणाऱ्या प्रत्येक विठ्ठल भक्तांच्या बाबतीत घडणाऱ्या अन्याया बाबत ठेवाल ही अपेक्षा आहे. शासन दरबारी या संघटनेचे खूप वजन आहे,सरकार आणि प्रशासन जेव्हा जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात फडकरी,दिंडीकरी वारकरी यांच्याशी संवाद साधू इच्छिते,संपर्क करू इच्छिते,समस्या व उपाय योजना जाणून घेऊ इच्छिते तेव्हा तेव्हा याच संघटनेच्या अध्यक्षास प्रभावी भूमिका पार पाडावी लागते.पंढरपुरात मोठं मोठे मठ असलेले अनेक फडकरी आहेत,तर या फडावर,मठात अगदी अनेक पिढ्यापासून येणारे लाखो वारकरी आहेत.भविष्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची पुनर्रचना झाल्यास सदस्य वा सहअध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्वाचा मानही आपणास मिळू शकतो.सोने रूपे मृत्तिकेसमान समजणाऱ्या संप्रदाय सेवकाला याची कधी महती वाटत नाही.(अपवाद वगळता ).
या भूवैकुंठाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित करताना,येथे येणारे केवळ महाराज फडकरीच नव्हे तर सामान्य विठ्ठलभक्त वारीचे वारकरी भाविक देखील आपल्या पदाकडे पाहून जे जे अपिवत्र तेते अव्हेरण्याची आणि प्रसंगी नाठाळाच्या माथी काठीचा प्रसाद देण्याची अपेक्षा करत असतात याची जाणीव ठेवत सत्ताकारणी,राजकारणी,प्रशासकीय पदाधिकारी यांच्याकडून तुम्हाला अध्यक्ष म्हणून मिळणाऱ्या वैयक्तिक मान सन्मानापेक्षा महत्वाचे समजून आपण या अतिशय महत्वपूर्ण संघटनेच्या अध्यक्षपदाचा आपला कार्यकाल नव्या उंचीवर नेऊन ठेवाल हीच अपेक्षा !
– राजकुमार शहापूरकर
(संपादक -पंढरी वार्ता )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *