ताज्याघडामोडी

शिवभोजन योजनेच्या केंद्रांवर आता राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

शिवभोजन केंद्रांवरील गैरप्रकारांचा मुद्दा गाजल्यानंतर राज्यातील सर्वच शिवभोजन केंद्रांवर सीसी कॅमेरे लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या केंद्रावर परिणामकारकपणे नियंत्रण ठेवता यावे, यासाठी सीसी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४ शिवभोजन केंद्रांवरही सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवभोजन केंद्र चालकांना ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन थाळीची सुरूवात झाली. प्रारंभी शहरात व नंतर प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्रे सुरू केली. या सर्व केंद्रांवरून सुरुवातीच्या काळात १० रुपये प्रती थाळी याप्रमाणे दररोज १५०० थाळींचे वाटप करण्यात येत होते. त्यानंतर थाळ्यांची संख्या तीन हजारपर्यंत वाढवली. कालांतराने शिवभोजन थाळीची लोकप्रियता वाढली. मात्र वितरणप्रक्रियेत गैरप्रकारही होत झाल्याने शिवभोजन केंद्रांवर सीसी कॅमेरे लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

काय आहेत शासनाचे आदेश : शिवभोजन केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशात काही महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे.

१) शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे अनिवार्य असून,शिवभोजन केंद्राची जागा व्यापेल, अशा पद्धतीने ही यंत्रणा केंद्रात बसवावी.

२) केंद्राच्या रचनेनुसार एक, अधिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे बंधनकारक राहणार आहे. हे केंद्र दिसू शकेल, अशा पद्धतीने यंत्रणा लाववी.

३) केंद्र चालकाने शिवभोजन वाटपाच्या विहित कालावधीतील किमान ३० दिवसांचे प्रक्षेपण तपासणीस उपलब्ध राहिल, याची दक्षता घ्यावी. हा प्रक्षेपणाचा डेटा अधिकाऱ्यांना आवश्यक लागेल तेव्हा तपासणीस पेड ड्राईव्हमध्ये उपलब्ध करुन द्यावा.

४)केंद्रांबाबत तक्रार आल्यास, अनियमितता आढळल्यास प्रक्षेपण तपासून अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. केद्रांवर अशा आढळून आल्या होत्या अनेक त्रुटी

बाळापूर येथील बस स्थानक परिसरातील शिवभोजन केंद्रात त्रृटी आढळल्याने ते केंद्र बंद करण्याचा आदेश यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. केंद्रात बसण्याची व्यवस्था नसल्याने बस स्थानकातील आसनांचा वापर करण्यात येत होता. स्वच्छ खुर्ची व टेबलची व्यवस्था जागा उपलब्ध नव्हती. इंटरनेट कनेक्टीव्हिटीमुळे दुबार फोटो अपलोड होतात, असे म्हणणे सुसंगत नव्हते. लाभार्थ्यांसाठी हँडवॉश व बेसीनची व्यवस्था नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगच्या (संसर्ग टाळण्यासाठी विशिष्ट अंतर ठेवणे) नियमाचे पालन होत नव्हते.​​​​​​

गतवर्षी मध्यवर्ती बस स्थानक व रेल्वे स्थानक परिसरातील शिवभोजन केंद्राची पुरवठा अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. केंद्रामध्ये अनुक्रमे दहा व सात त्रृटी आढळल्या होत्या. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावली. या नोटीसचे लेखी स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे दिसल्याने व शासनाच्या अटी व शर्तीचा भंग केल्याने केंद्र चालकाला दहा हजार दंड आकारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *