ताज्याघडामोडी

राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

मुंबईसह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढतोय. कोरोना, ओमायक्रॉन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

या निर्बंधांमुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का,अशी भिती सर्वसामांन्यामध्ये आहे. या लॉकडाऊन करण्याच्या मुद्द्यावरुन आणि इतर मुद्द्यांवरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी  राज्यात केव्हा लॉकडाऊन लावणार याबाबतची माहिती दिली आहे.

टोपे काय म्हणाले?   

“राज्यात जेव्हा 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावणार”, अशा स्पष्ट शब्दात आरोग्यमंत्र्यांनी लाॉकडाऊनबाबतचे संकेत दिले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी विविध मुद्द्यांवरुन प्रतिक्रिया दिली. 

ओमायक्रॉन दुप्पट वेगाने वाढतोय 

“राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार दुप्पट वेगाने होतोय. त्यामुळे सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. ओमायक्रॉनसाठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही, गरज नाही”, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

निर्बंधांवरुन काय म्हणाले? 

राज्यात आज मध्यरात्रीपासून नियमावलीचं अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उपहारगृह, सिनेमागृह आणि बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. या निर्बंधांवरुन आरोग्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. 

“एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीच्या उद्देशाने निर्बंध लागू करण्यात आले आहेत”,असं आरोग्यमंत्री म्हणाले.

राज्यातील लसवंतांची टक्केवारी

“राज्यात कोरोना लसीचा पहिला डोस हा 87 टक्के लोकांनी घेतला आहे. तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची टक्केवारी ही 57 टक्के आहे”, असं टोपे यांनी सांगितलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *