Uncategorized

बहुतांश पंच मेले असतील,वस्ताद उरले नसतील पण थोडेफार पैलवान उरलेत एवढे लक्षात घ्या ! 

शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तालिमी,ओपन जिम,व्यायाम शाळा यांना लाखो रुपये अनुदान अथवा साहित्य स्वरूपात साहाय्य देण्यासाठी शासन स्तरावर विवीध निर्णय घेतले जातात.   
पंढरपूर शहरात 

१) बारभाई तालीम 

२) थोरली तालीम 

३) कवडे तालीम 

४) डबल मडकी तालीम 

५) दाळे गल्ली तालीम

७) समर्थ रामदास तालीम 

८) कौलारू तालीम 

९) राघोजी भांगरे तालीम (सरकारी तालीम)

१०) चिंचबन तालीम

अशा जळपास 10  तालमी गेल्या शतक भरापासून अस्तित्वात आहेत.पूर्वीच्या काळी तांबड्या मातीतील कुस्तीस मोठी प्रतीष्ठा होती आणि घरटी एक पैलवान असावा अशी मानसिकता होती. या पैकी काही तालमी या जशा कुस्तीच्या आखाड्यात वट्ट राखून होत्या तसेच शहराच्या राजकारणावर देखील या तालमीचे वस्ताद,पंच यांचा मोठा वकूब होता.शहरातील रेल्वे रुळाच्या खालील बाजूस नगरसेवक होण्यासाठी शहरातील एखाद्या तालमींशी नाव जोडलेले असणे प्रतिष्टेचे समजले जात असे.आणि खरोखरच ज्या वार्डात वरील तालमी आहेत त्याचे सर्वेसर्वा हेच नगरसेवक म्हणून नगर पालिकेत प्रतिनिधित्व करत होते.  तालमीच्या पाठबळावर कुणी नगराध्यक्ष झाले,कुणी अनेक वर्ष नगरसेवक म्हणून वावरले हा इतिहास माहिती असलेली आमची पिढी अजून जिवंत आहे.  

यात थोरली तालीम आणि बारभाई तालीम यांच्या राजकीय वर्चस्वावर तर एक पुस्तक लिहता येईल इतके प्रसंग आणि घडामोडी मला ज्ञात आहेत.   साधारणत: १९९० पर्यत शहरातील तालमी या व्यायामासाठी येणाऱ्या पैलवानांच्या जोर बैठकांच्या हुंकाराने घुमून जायच्या.आणि या युगाचा मी स्वतः बारभाई तालमीच्या रूपाने साक्षीदार आहे.   

 मात्र पुढे या तालमीमध्ये राजकारण घुसले,तर कुठे घुसवले गेले.आपल्या चेल्याकडून  तांबड्या मातीत समोरच्या मल्लाला कुठला डाव टाकून पराभूत करायचे याची चिंता करण्याऐवजी आपल्या भागात आपला राजकीय वट्ट कसा वाढवता येईल,पालिकेत सेवक म्हणून कसे घुसता येईल याला काही ठिकाणी प्राधान्य देण्यात आले.आणि राजकीय इमान बाळगण्या ऐवजी तांबड्या मातीशी इमान बाळगणारे मल्ल हळू हळू तालमीकडे वळण्याचे प्रमाण कमी होत गेले.   

  आता शहरातील अनेक तालमी ओस पडू लागल्या आहेत.अनेक तालमीचे पंच,विश्वस्त,वस्ताद आता ह्यात नाहीत,तर अनेक तालमीच्या ७/१२ उताऱ्यावर जे कधीही तालमीकडे फिरकत नाहीत त्यांची नावे मालकी हक्क सदरी पंच म्हणून कायम आहेत,या पैकी काहीजण अनेक वर्षांपुवी मयत असून सुद्धा.       

काही तालमीत त्याच भागातील होतकरू,व्यायामाची आवड असलेले तरुण पुढाकार घेऊन तालमीस तालीम ठेवण्यासाठी धडपडत आहेत.तर काही ठिकाणी तालमी या गल्लीतील घरात झोपायला जागा नसल्याच्या वळकट्या ठेवण्यासाठी आणि रात्रीच्या मुक्कामाचे ठिकाण झाल्या आहेत.         

एकेकाळी पंढरपूर शहरात प्रचंड दबदबा असलेल्या तालमीची दुरावस्था झालेली आहे,काही तालमी वर्षानुर्षे कुलूपबंद आहेत तर काही ठिकाणी थोडेफार पैलवान,व्यायामाची आवड असलेल्या लोकांची वर्दळ आहे पण बहुतांश ठिकाणी आता वस्ताद हि संकल्पना लोप पावली आहे.   

 मला वाटते शहरातील या तालमी म्हणजे आपल्या शहराचे वैभव आहे.त्यामुळे राजकीय नेते,समाजसेवक आणि सर्वात म्हणजे कुस्तीवर प्रेम करणारे जे काही जुने जाणते जेष्ठ शिल्लक आहेत,ह्यात आहेत त्यांनी हा वारसा जपण्यासाठी थोडा तरी पुढाकार घ्यावा.      लक्षात घ्या राजकारणापुढेही एक विश्व आहे,राजकीय पदांच्या माध्यमातून मिळणारी प्रतिष्ठा हि तत्कालीन असते पण काही कामे निरपेक्ष भावनेने आणि ध्येयवादाने केली तर सामान्य लोक त्यांची आठवण काढल्या शिवाय रहात नाहीत.   

पंढरपूर नगर पालिकेने आज शहरात एका ठिकाणी तालीम बाधण्यासाठी सुमारे २३ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेले टेंडर काढले आहे.इतका मोठा खर्च करून नगर पालिका तालीम बांधत आहे हे पाहून मला एक प्रश्न पडला आहे.निदान नगर पालिकेने रघोजी भांगरे व्यायाम शाळा अर्थात सरकारी तालीमची दुरावस्था तरी एकदा नजरेखालून घालावी. 

– राजकुमार शहापूरकर   

    (संपादक-पंढरी वार्ता  )       

( प्रत्येक तालमीला जसा वस्ताद आणि पैलवान यांच्या कारकिर्दीचा इतिहास आहे तसाच आपल्या भागात राजकीय वर्चस्वाचाही इतिहास आहे आणि तो मी लवकरच मांडणार आहे)           

                         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *