ताज्याघडामोडी

बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं

पती आणि पत्नी यांच्यात वाद होतच असतात. वादानंतर काही काळ अबोला असतो आणि नंतर दोगेही एकमेकांसोबत पुन्हा बोलू लागतात. मात्र, सातारा जिल्ह्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर संतापलेल्या पतीने चक्क आपल्या घरालाच आग लावली. घर पेटवल्यानंतर त्यांच्या शेजारील 10 घरांनीही पेट घेतला आणि यामुळे शेजारील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असेलल्या माजलगाव येथे ही घटना घडली आहे. संजय पाटील या व्यक्तीचं आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. या भांडणानंतर संतापलेल्या संजय पाटील याने चक्क आपलं घर पेटवलं. घराला आग लागल्याने घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर संजय पाटील यांच्या घराशेजारी असलेल्या 10 घरांनीही पेट घेतला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संजय पाटील याला पकडून चांगलाच चोप दिला. या आगीत सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पती आणि पत्नी यांच्यात वाद नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. पण दोघांच्या भांडणात दहा घरांची राखरांगोळी झाली आहे.

कौटुंबिक वाद विकोपाला गेला आणि सासऱ्याने सुनेवर वार केल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिम परिसरातील शनी नगर येथे ही घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. सुनेवर हल्ला केल्यानंतर सासऱ्याने घर पेटवून दिलं. या घटनेने संपूर्ण बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किसन जाधव हे बदलापुरात आपला मुलगा, सुन आणि दोन नातवंडांसोबत राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास किसन जाधव यांचा सुनेसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, किसन जाधव यांनी थेट सुनेवर हल्ला केला. घटनेच्यावेळी किसन जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता तर दोन्ही नातवंड ही घराबाहेर खेळायला गेली होती.

किसन जाधव यांनी सुनेवर हल्ला केला असता तिने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घरात दाखल झाले. किसन जाधव यांनी केलेल्या हल्ल्यात सुन गंभीर जखमी झाली होती. शेजाऱ्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर किसन जाधव यांनी घराचा दरवाचा आतून लावला आणि घर पेटवून दिले. तसेच घरातच गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. किसन जाधव यांच्या घरातून जळण्याचा वास आणि धूर येत असल्याचं शेजाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा आतून बंद होता आणि उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला कळवलं.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी किसन जाधव हे घरात होरपळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *