ताज्याघडामोडी

लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांप्रती कुटील डाव थांबवावा – आ. समाधान आवताडे*

लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांप्रती कुटील डाव थांबवावा – आ. समाधान आवताडे

आपल्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने निरा उजवा कालवा व उजनी धरण क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या उभ्या पिकांना सदर कालव्यातील पाण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे कालव्यातील पाणी घेण्यात येत नाही. शासन नियमांनुसार विहिरीवरील पाणीपट्टी माफ असल्याने या क्षेत्रावरील पिकांपोटी पाणीपट्टी भरण्यात येत नाही. अशा विविध कारणांना पुष्टी देत लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांच्या सहमतीने विशिष्ट अर्ज भरून घेण्याचा व त्यांना सिंचन लाभापासून वंचित ठेवण्याच्या कुटील अमिषास लाभार्थी शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे यांनी केले आहे.

लाभक्षेत्रातील विहिरींवर संचित होणाऱ्या क्षेत्राचे बाबतीत संबंधित शेतकऱ्यांकडून सिंचन प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये विहिरीवर सिंचित होणाऱ्या क्षेत्रास कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने पाणी लागत नसल्याचे व सदरील क्षेत्र विहिरीच्याच पाण्यावर सिंचित होत असल्याचा अजब जावईशोध निरा उजवा कालवा सिंचन प्रशासनाने लावून शेतकऱ्यांना नाहरकती व स्वखुशीने अर्जरूपी प्रमाणपत्र भरण्यास भाग पाडले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

पाणी हे जीवन आहे असे आपण नेहमीच ऐकत अनुभवत आलो आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचा बागाईत अथवा ओलावापणा प्रामुख्याने पाण्यावर सर्वस्वी अवलंबुन असतो. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धतता करण्यासाठी शेतकरी अनेक पाणी स्रोत निर्माण करण्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबत असताना विहिरीत पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना कालव्यातील पाण्याची गरज भासणार नाही अशी प्रतिमा उभी करून शेतकऱ्यांकडून असे अर्ज भरून घेणे म्हणजे लाखोंचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकरी जातीची क्रूर चेष्टा असल्याने शेतकऱ्यांनी अशा भुलभुलैया आश्वासनास बळी पडू नये. अन्यथा एकदा आपल्या हक्काचे पाणी दुसरीकडे वळले तर भविष्यात त्याचे खूप मोठे दूरगामी परिणाम भोगावे लागतील असे आवाहनही आ. आवताडे यांनी केले आहे.

उजनी धरण व निरा उजवा कालवा आदी लाभक्षेत्रातून अनेक शेतकऱ्यांना उपरोक्त पद्धतीने अर्ज भरण्यासाठी भाग पाडले जात आहेत परंतु या सर्व अन्यायकारक घडामोडीचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेणे असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी म्हटले आहे.

 

चौकट – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून अर्थिक खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना असे अर्ज भरून घेणे म्हणजे त्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेण्यासारखे असल्यामुळे सदरचा खटाटेप थांबवून अर्ज भरून घेऊ नयेत अन्यथा मोठे आंदोलन उभा करू – आ. समाधान आवताडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *