गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे.समाधान पाऊसही झालेला नाही.शेतकऱ्यांनी ऊस,फळबागा,खरीप पिके व चाऱ्याची पिके घेतली आहेत त्यांना पाण्याची कमतरता भासत आहे.तर अनेक गावच्या पाणी पुरवठा योजनांनाही पाण्याची कमतरता भासत आहे.उजनी धरणात सध्या ६२ टक्के उपयुक्त जलसाठा झालेला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गेल्या तीन आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे त्यामुळे खरीप हंगामासाठी पिकाचे नियोजन केलेले शेतकरी अडचणीत आहेत.तर याचा मोठा फटका फळ बागायती व चारा पिकांनाही बसणार आहे.उजनीतून वेळीच पाणी सोडल्यास दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांची भावना असून उजनी धरणावरील १० मोठी धरणे १०० टक्के भरली असताना व उजनी धरण ६२ टक्के भरले असताना व सध्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी होत असताना या बाबत जलसंपदा विभागाने तातडीने निर्णय घेत पाणी सोडण्याचे आदेश देणे गरजेचे झाले आहे.