लोणावळा, 27 जून: ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या आणि राजकीय आरक्षणाच्या संदर्भात लोणावळ्यात ओबीसी महासंघाने ओबीसी परिषद भरवली होती. या परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला. या ओबीसी परिषदेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाषणा दरम्यान केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
वडेट्टीवारांना धमकावणारे कोण?
विजय वडेट्टीवार म्हणाले, सर्वपक्षीय नेत्यांनी एकवटलं पाहिजे आणि संघर्षासाठी रस्त्यावर उतराला हवे.ओबीसी समाजाच्या हक्कासाठी बोलतो, समाजाच्या बाजू मांडतो मात्र मला दररोज धमक्यांचे फोन येत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून धमकी देणारे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रस्तापितांच्या विरोधात जाऊन लढाई करणं तेवढं सोपं नाहीये. मला भीती नाहीये. बवनकुळे साहेब मला तर तिकिट मिळण्याची तर भीतीच नाहीये असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांचं तिकीट कापलं होतं.
ओबीसी मंत्रालय स्टाफ नाही, निधी नाहीये, अजित पवार-धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार फॉलोअप घ्यावा लागला. आता नाना पटोले म्हटले बिनधास्त लढ, त्यामुळे परिणामांची चिंता मी करत नाही. ओबीसी मंत्रालय मिळाले त्यामुळे ओबीसी समाजाच्या जवळ गेलो. पंकजा ताई तुम्ही ग्रामविकास मंत्री होता मी विरोधी पक्ष होतो. त्यामुळे वाटले महसूल खाते मिळेल पण मिळाले ओबीसी खाते मिळाले, काय करणार ओबीसी समाजात आहे त्यामुळे काय बोलणार असं म्हणत वडेट्टीवार यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.