राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी अनुक्रमे 500 आणि 150 असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र शहरातील काही खाजगी प्रयोगशाळा, कोरोना सेंटर व रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजिन टेस्टसाठी नागरिकांना 150 ते 500 रुपये तसेच आरटीपीसीआर चाचणीसाठी 600 ते एक हजार रुपये मोजावे लागत आहे.मात्र या दरांची अंमलबजावणी पूर्णपणे झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या वर्षी राज्यात कोरोनाची सुरवात झाली तेव्हा आरटीपीसीआरसाठी साडेचार हजार रुपये घेतले जात होते. त्यानंतर सातत्याने कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले आहे. तर आता ते 500 रुपये करण्यात आले आहे.तरीही शहरातील काही खाजगी लॅबमधून शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारले जात आहेत.याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी व सर्वसामान्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी शिवसेनेचे शहर संघटक गणेश घोडके यांनी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरटीपीसीआरचे नवे दर
संकलन केंद्रावर नमुने देण्यात आल्यास : 500
कोविड सेंटर, रुग्णालय, क्वारंटाईन सेंटर : 600
नागरिकांच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास : 800
अँटिजिन टेस्ट सुधारित दर आकारणी (सर्व करांसाहित रुपयात)
सार्स कोविड 19 साठी रॅपिड अँटिजिन टेस्ट :
1) रुग्ण स्वतः तपासणीसाठी प्रयोगशाळेत आल्यास : 150
2) तपासणी केंद्रावरून आठ एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास : 200
3) रुग्णाच्या घरीजवून तपासणीसाठी नमुने घेतल्यास : 300
अशा प्रकारे दर आकारले जाणे अपेक्षित आहे.तरी वेळोवेळी आकस्मिक लॅबची तपासणी करून शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या लॅबवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.