कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू करीत निर्बंधही कडक केले आहेत. शहरासह गावातही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. तरीही अनेक ग्रामस्थ बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसत आहे. हे संकट टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले. दवंडी दिली तरीही ते ऐकत नाहीत. गावच्या पारावर गप्पा मारत बसतात. अशा ग्रामस्थांसमोर शेवटी कामरगावच्या सरपंचाने साष्टांग दंडवत घालणे सुरू केले आहे. त्यानंतर हे ग्रामस्थ विनाकारण गर्दी करणे टाळू लागले आहेत.
नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी हटवादी ग्रामस्थांसमोर हतबल झाल्याने हा अनोखा मार्ग स्वीकारला आहे. सामाजिक नियम पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
तरीही अनेकजण यातून बोध घेताना दिसत नाहीत. उन्हाळ्यामुळे अनेकांच्या शेतातील कामे बंद असल्याने हे ग्रामस्थ गावातच असतात. पारावर बसून गप्पा मारणे, पत्ते खेळणे, मोबाईलवर गेम खेळत बसणे याशिवाय भाजी आणि किराणा दुकानात गर्दी, वेशीजवळ, अन्य सार्वजनिक ठिकाणी रेंगाळून गप्पा मारणे असे प्रकार होत असल्याचे दिसून येते.
दुसऱया लाटेत गावातील 25 ते 30 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दहा ते बारा जण अद्याप उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लोकांना सतत आवाहन केले जात आहे. विविध माध्यमांतून गावकऱयांचे प्रबोधन केले जात असूनही, अनेक जणांमध्ये याबाबत बेफिकीरीची वृत्ती दिसून येते. त्यामुळे नाईलाजाने सरपंच कातोरे या हटवाद्यांसमोर चक्क साष्टांग दंडवत घालत आहेत.नियम मोडून धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड