ताज्याघडामोडी

राज्यात आजपासून संचारबंदी लागू

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामध्ये या काळात संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक सेवा किंवा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. शिवाय, सार्वजनिक वाहतुकीसारख्या इतर सेवांना देखील वगळण्यात आलं आहे. पण नेमकं या लॉकडाऊनचं स्वरूप कसं असणार आहे? अत्यावश्यक सेवांमध्ये नेमक्या कोणत्या घटकांचा समावेश असेल? काय सुरू असेल आणि काय बंद राहील? याबाबत अजूनही काही प्रमाणात संभ्रम दिसून येतोय. त्या पार्श्वभूमीवर या लॉकडाऊनचं नेमकं स्वरूप समजून घेऊयात.

कसा असेल राज्यात लॉकडाऊन?

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्यात १४ एप्रिल २०२१ रात्री ८ ते १ मे २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ नुसार संचारबंदी आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात कुणालाही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. या कालावधीमध्ये जीवनावश्यक सेवा आणि अपवाद सेवा अशा दोन प्रकारच्या सेवांसाठी सरकारने स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. जीवनावश्यक सेवांमध्ये समावेश असलेल्या सेवा आणि उद्योगांना संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे. तर अपवाद सेवांमधील सेवा आणि उद्योगांना फक्त सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेदरम्यान नियमांमधून सूट देण्यात आली आहे. या सेवांमध्ये मनुष्यबळ किंवा इतर बदलांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जीवनावश्यक सेवांमध्ये कशाचा समावेश?

१. रुग्णालय, लॅब, क्लिनिक, लसीकरण, मेडिकल इन्शुरन्सची कार्यालये, फार्मसी, औषध कंपन्या, यासाठी लागणाऱ्या सामानाचे डिलर, त्यांची वाहतूक, पुरवठा, लसींचं उत्पादन आणि पुरवठा, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांच्यासाठीचा कच्चा माल यांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा यात समावेश होतो. त्याशिवाय, प्राण्यांचे दवाखाने, अन्नपदार्थांची दुकाने इ. माल वाहतूक देखील या काळात सुरू राहील.

२. किराणाची दुकानं, भाजीपाला, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी आणि इतर अन्नपदार्थांची दुकानं, शीतगृहे. विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बस वाहतूक या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी ई-कॉमर्सची सेवा.

३. याशिवाय स्थानिक प्रशासनाच्या सार्वजनिक सुविधा(दुरुस्ती-देखभाल इ.), पाणीपुरवठ्याशी संबंधित सेवा, टेलिकॉम व्यवस्थेची दुरुस्ती आणि मेंटेनन्सची कामे. पेट्रोल पंप आणि पेट्रोलियमशी संबंधित इतर उत्पादने

४. इतर देशांचे दूतावास, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि आरबीआयशी संबंधित इतर सेवा, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरीज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आणि SEBI शी संबंधित इतर आस्थापने, सर्व प्रकारच्या वस्तूंची आयात-निर्यात आणि त्याच्याशी संबंधित कामे.

५. उत्पादन पूर्व आणि उत्पादनानंतरच्या पुरवठा इ. प्रक्रियेशी निगडित शेतीशी संबंधित सर्व कामे या काळात सुरू राहतील.

६. सर्व कार्गो सेवा या काळात सुरू राहतील. त्यासोबतच डाटा सेंटर्स, क्लाऊड सर्व्हिस, आयटी सेवा सुरू राहतील. याशिवाय, एटीएम, पोस्ट सेवा, सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा, वीज आणि गॅस पुरवठा सेवा,

७. शासनमान्य माध्यमांशी संबंधित सर्व व्यवहार आणि कामांचा या सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी काय असतील नियम?

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जीवनावश्यक सेवा म्हणून समावेश करण्यात आला असला, तरी वाहतूक व्यवस्थेला नियम घालून दिले आहेत. रिक्षामध्ये चालक + २ प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक + २ प्रवासी (किंवा अधिक क्षमतेची गाडी असल्यास ५० % प्रवासी) आणि बसमध्ये पूर्ण क्षमतेने फक्त बसून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड केला जाईल. टॅक्सी किंवा इतर वाहनात एका प्रवाशाने जरी मास्क घातला नसेल, तर संबंधित व्यक्ती आणि चालक अशा दोघांना प्रत्येकी ५०० रुपये दंज करण्यात येईल. सर्व वाहनं प्रत्येक फेरीपूर्वी सॅनिटाईज करणं आवश्यक आहे. सर्व वाहनांच्या चालकांनी लवकरात लवकर लस घेणं आवश्यक आहे. रेल्वेच्या जनरल डब्ब्यामध्ये देखील स्टँडिंग प्रवासावर बंदी असेल. बस, ट्रेन किंवा विमानातून आलेल्या प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना सोबत तिकीट ठेवणं बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *