मुंबई, 27 मार्च: कोरोनाव्हायरसचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्याने Mission Begin again अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. आजपासूनच (27 मार्च मध्यरात्रीपासून) हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडण्यावर बंदी आहे. मास्क न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यास तातडीने दंड करण्यात येईल. या कुठल्याही नियमाचं पालन न करणाऱ्यांना जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजनिक आस्थापना बंद राहतील. हॉटेल, बार, सिनेमागृहसुद्धा रात्री आठ नंतर बंद होतील. या काळात होम डिलिव्हरी सर्व्हिस मात्र सुरू राहील. मास्क न लावता कुणीही व्यक्ती आढळली तर 500 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. रस्त्यावर थुंकल्यास 1000 रुपये वसूल करण्यात येतील.