विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग झाली होती. मात्र राज्यात पक्षांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांकडे नेत्यांचा कल वाढला होता. मात्र माथाडी कामगारांचे नेते आणि शिवसेनेकडून लोकसभा लढविणारे नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. तसेच भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत.
माथाडी कामगारांच्या प्रश्नांनावर वेळोवेळी मागणी करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ दिला नाही. कामगारांच्या प्रश्नी आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठकदेखील लावली नाही. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात शिवसेनेत काम करणे जमणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे, असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी शिवसेना सोडण्याची घोषणा केली होती.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते. पण या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान आपण माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता आहे. पुढील काळात काय करायचे हा माझा वैयक्तीक निर्णय असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ते माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीदिनी ते बोलत होते.