Uncategorized

राधासुता तेव्हा कुठे गेला होता आपला धर्म !

विठ्ठला तुझी चंद्रभागा मी अडवतोय मला माफ कर म्हणत महाराष्ट्राचे अलौकिक नेते स्व.यशवंत राव चव्हाण यांनी उजनी धरणाच्या पायाभरणीची कुदळ मारली आणि साऱ्या सोलापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारे उजनी धरण उभे राहिले.जायकवाडी धरणानंतर दोन नंबरचे विशालकाय धरण म्हणून उजनी ओळखले जाऊ लागले आणि सोलापूर जिल्ह्यात कृषीक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.आणि सोलापूर जिल्ह्यात नामदेवराव जगताप गटाचे तत्ववादी नेतृत्व करणारे स्व.औदूंबरआण्णा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यात कृषी औधोगिक क्रांतीचा विडा उचलला.स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या मोलाच्या सहकार्याने गुरसाळेच्या माळरानावर सामान्य कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धीचा मळा फुलवणारा विठ्ठल उभा राहिला.आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या सहकार्याची आठवण म्हणून कारखाना स्थळ हे वेणूनगर म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढील वाटचालीत विठ्ठलला सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाच्या खूप झळा सोसाव्या लागल्या,जिल्हा बँक कधीही ‘विशेष’सहकार्य करत नसे.राज्य सहकारी बँक तेवढी पाठीशी उभी रहात असे आणि स्व.अण्णांनी कारभारच असा केला कि कुठल्या बँकेच्या दारात कर्जासाठी वारंवार कटोरा घेऊन जावे लागत नसे.सुतळीच्या तोडा सुद्धा कारखान्यातून बाहेर जाऊ शकत नाही अशी कारकीर्द स्व.अण्णांची होती हे आजही आवर्जून आणि अभिमानाने सांगितले जाते.याच स्व.अण्णांचा वारसा सांगत आज ‘विठ्ठल’च्या विदारक स्थितीचे वर्णन करत त्यांचे नातू युवराज पाटील यांनी कारखान्याची पुढील निवडणूक स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून लढवणार असल्याचे ऍड.दिपक पवार यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतरच्या विठ्ठल हॉस्पिटल येथील बैठकीत जाहीर केले आहे.आणि त्यांच्या या घोषणेनंतर विठ्ठल परिवारात खळबळ उडाली आहे.युवराज पाटील यांच्या या घोषणेनंतर विठ्ठल परिवारात स्व.आमदार भालके समर्थक आणि युवराज पाटील-गणेश पाटील सर्मथक असे सरळ सरळ दोन गट पडले आहेत.

पण ”विठ्ठल”कारखान्यास गतवैभव प्राप्त झाले पाहिजे,विठ्ठल कर्जाच्या खाईतून बाहेर आला पाहिजे,विट्ठलकडे गाळपासाठी ऊस रवाना केल्यानंतर राजकारणाशी देणं घेणं नसलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर बील वेळेत मिळेल का याची चिंता नाही झळकली पाहिजे,राजकारण आणि विठ्ठलचे व्यवस्थापन हे वेगळे असले पाहिजे.अशी आशा बाळगणारा कार्यक्षेत्राच्या शेजारीच असलेला विठ्ठलराव शिंदे कारखाना,ज्याची उभारणी विठ्ठल नंतर १८ वर्षांनी झाली तो कारखाना आज प्रत्येक हंगामात दहा लाखाच्या पुढे गाळप करत असताना आणि विठ्ठलच्याच कार्यक्षेत्रातून हजारो हेक्टर ऊस तिकडे जात असताना आमच्या तालुक्यातील कष्टकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणाऱ्या  या प्रति विठ्ठलाची अशी अवस्था का असा प्रश्न पण खाजगीत उपस्थित करणारा विट्ठलचा फार मोठा सभासद वर्ग गेल्या ५ वर्षात उदयास आला आणि मागील तीन वर्षापासून अशा विट्ठलप्रेमी सभासदांना सोबत घेत अभिजित पाटील हे वारसा न सांगता परिस्थिती सांगत सत्ता कुणाचीही असो प्रत्येक राजककर्त्याचे उंबरठे झिजवताना दिसू लागले.

खरे तर २०१५ मध्ये झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रा.रोंगे यांनी आपले पॅनल उतरवले,पराभूत झाले पण प्रचारात जे मुद्दे मांडले ते या निवडणुकीत विजयी झालेल्या युवराज पाटील यांच्यासह आज जे त्यांच्या सोबत आहेत त्यांनी विचारात घेतले असते तर विट्ठलची आज झालेली अधोगती नक्कीच रोखली गेली असती अशीच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.गत वर्षी विट्ठलची दारे बंद राहिले,महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एखाद्या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना तीन महिने तुरुंगात काढावे लागले त्यावेळी युवराज पाटील आणि वारसा सांगणारे आणखी कोणी असतील त्यांनी मौन बाळगले,स्व.अण्णांचे दुसरे वारसदार अमरजित पाटील हे या काळात एकाकी लढत होते,आवाज उठवत होते तेव्हा आज विठ्ठल बद्दल चिंता व्यक्त करणारे दूर राहिले हे विट्ठलचा राजकारण गेलं चुलीत म्हणणारा सभासद आणि कागमार कधीही विसरणार नाही.     

 विठ्ठल हा खरोखरच राजवाडा होता,या राजवाड्याच्या खजिन्याच्या चाव्या या कायम चेअरमनच्या हाती राहिल्या आहेत आणि स्व.आण्णानंतर काही संचालक हे मूक राहिले तर काही वाटेकरी राहिले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ऍड.दीपक पवार यांचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पद काढून घेण्यात आले.त्यामुळे नाराज झालेल्या युवराज पाटील,गणेश पाटील,दीपक पवार यांनी पंढरपूर शहर तालुक्यातील समस्त राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना नाराजीचा मेसेज धाडत विठ्ठल हॉस्पिटलमध्ये बैठक बोलावली.आणि थेट विट्ठलची निवडणूक स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा केली गेली.भगीरथ भालके याना राष्ट्रवादीची उमेवारी कशी मिळते ते बघतोच असे आव्हान देण्यात आले आणि याच बैठकीत युवराज पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला दीपक पवार यांच्यासह काही उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना युवराज पाटील यांनी चेअरमन पदाच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांनी घोडेबाजार केल्याचा खुलासा केला आणि विठ्ठल कारखान्याची आर्थिक परिस्थिती कशी वाईट झाली आहे याचा खुलासा केला.आणि हे सांगत असताना आम्हीही त्यास संचालक म्हणून अप्रत्यक्ष जबाबदार असल्याचे कबूल केले.आणि दीपक पवार यांचे गेलेले पद हे गेल्या वर्षी कारखाना बंद राहिल्याने विठ्ठलच्या सभासदांची,उसउत्पादकांची झालेली वाताहत,पगार द्या आम्हाला जगण्याचे दुसरे कुठलेही साधन नाही हे ओरडून सांगणाऱ्या कामगारांनी आंदोलन केल्यामूळे भोगलेला तुरुंगवास या पेक्षा महत्वाचे समजून युवराज पाटील यांनी मौन सोडले आणि विट्ठलची परिस्थिती कथन केली.पण याच काळात कामगाराना न्याय द्या म्हणून ओरडणारे स्व.अण्णांचे दुसरे वारसदार अमरजित पाटील आणि तुरुंगवास भोगत असलेल्या कामगारांच्या घरी जाऊन हवी असेल ती मदत करणारे,राज्यातील सहकार मंत्री,सहकार आयुक्त,साखर आयुक्त,कामगार आयुक्त यांचे उंबरठे झिजवून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासद,ऊस गाळपास पाठविलेले ऊसउत्पादक शेतकरी आणि वर्ष वर्ष पगार होत नसल्याने हतबल ठरलेले कामगार यांच्या वेदना मांडणारे डिव्हीपी परिवाराचे चेअरमन अभिजित पाटील यांनी कुठलाही राजकीय दबाव झुगारून देत केलेली धडपड विठ्ठलला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे असे स्वप्न पाहणारा सभासद विसरणार नाही आणि गणेश पाटील हे तर नवखे आहेत पण आज स्व.अण्णांचा वारसा सांगणाऱ्या युवराज पाटील यांनी बाळगलेले मौनही विसरणार नाहीत. 

      विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा राजकारण विरहित चालला पाहिजे अशी विठ्ठलच्या हितचिंतकाची भावना आहे तसेच पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात परिचारक सोडून इतर कुणीही प्रबळ विरोधक असो त्याला साथ देणारा मतदार वर्ग जवळपास निम्म्याने राहिला आहे आणि दीपक पवार याना पुन्हा पद नाही दिले गेले तर भगिरथ भालके याना कशी उमेदवारी मिळते ते बघतोच हे युवराज पाटील यांनी दिलेले आव्हान हे पंढरपूर शहर तालुक्यातील परिचारक विरोधी मानसिकता असलेल्या मतदारांच्या दृष्टीने गौण बाब ठरली आहे.     

  स्व.आमदार भारत भालके हे आमदार झाल्याने पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेला काय फायदा झाला याचे उत्तर जसे २००९ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी दिले आहे.गेल्या पाच वर्षांपासून विठ्ठल वरील कर्जाचे वाढते आकडे,वार्षिक अहवालात ऑडिटरने ओढलेले ताशेरे,अमरजित पाटील आणि अभिजित पाटील यांनी या ऑडिट रिपोर्ट मध्ये आढळलेल्या गंभीर बाबी या बाबत सहकार आयुक्त,साखर आयुक्त एवढेच काय दस्तूरखुद्द जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केल्यानंतरही युवराज पाटील यांनी बाळगलेले मौन आज प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.आणि म्हणूनच दीपक पवार यांचे तालुकाध्यक्ष पद हे युवराज पाटील याना मौन सोडण्या इतके मोठे वाटलं का असा असा प्रश्नही उपस्थित होत आहे.               

ऍड.दीपक पवार यांचे पद गेले,युवराज पाटील आणि गणेश पाटील नाराज झाले,उमेदवारी बाबत खुले आव्हान दिले,स्वतंत्र पॅनलची घोषणा केली,पंढरपूर राष्ट्रवादीतील अंतर्कलहाच्या बातम्या आल्या.पुन्हा नवीन निरीक्षक आले पाठीमागून ते अनधिकृत असल्याचे पत्रही आले.विजयसिह देशमुख यांचे पद कायम राहिले आणि युवराज पाटील यांनी उमेदवारी बाबत दिलेले आव्हानही कायम राहिले.तूर्तास तरी विठ्ठलच्या निवडणुका लांबणीवर पडल्याचे दिसून येते,विधानसभेची मात्र प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु झाली आहे आणि राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण ? याच्या चर्चेस युवराज पाटील यांच्या आव्हानामुळे नवे बळ मिळाले आहे.

राहता राहिला विषय राष्ट्रवादी निष्ठेचा तर २०१४ च्या निडणुकीत सी.पी.बागल हे राष्ट्रवादीचे उमेवार होते आणि कोण कुठे होते हा स्वतंत्र विस्ताराने लिहण्याचा विषय आहे.                            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *