Uncategorized

चर्चा समाधान आवताडेंना दोन पक्षाच्या ऑफरची आणि जिल्ह्यातील बडया नेत्याच्या ”विदुर” नीतीची  

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार स्व.भारतनाना भालके यांच्या निधनानंतर या दोन्ही तालुक्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात परिचारक सर्मथक आणि परिचारक विरोधक असे दोनच गट अथवा पक्ष गेल्या चाळीस वर्षात ”प्रभावी” ठरले असून पारंपरिक राजकीय विरोधाच्या या लढाईत आता पंढरपूर तालुक्यात परिचारक याना खंबीरपणे विरोध करणारा नेता कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे तर मंगळवेढा तालुक्यात स्व.आ.भारतनाना भालके यांच्यानंतर भगीरथ भालके यांच्या रूपाने नेतृत्वाचा पर्याय स्वीकारण्याच्या तयारीत भालके गटाचे समर्थक असल्याचे दिसून येते.

          आगमी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर सध्यातरी आ.परिचारक अथवा त्यांच्या दोन्ही तालुक्यातील सर्मथकांकडून कोणतेही भाष्य केले जात नसल्याचे दिसून येते.राज्यात कोरोनाचा कहर वाढला नाहीतर मे महिण्याच्या ५ तारखेपर्यंत विधानसभा पोट निवडणुकीची कार्यवाही पार पडेल असा ठोस अंदाज व्यक्त केला जात असतानाच पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी बाबत जिल्ह्यातील एक बडा नेता पुणे मुक्कामी गाठीभेटीच्या माध्यमातून आश्वासक सूत्रे हलवीत असल्याची माहिती पंढरी वार्तास खास गोटातून प्राप्त झाली आहे.अशातच दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी बाबत प्रथमच उघड भाष्य केले असून भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेस कडून समाधान आवताडेंच्या उमेदवारीबाबत चाचपणी सुरु असल्याची चर्चा दोन्ही तालुक्यात सुरु झाली आहे.मंगळवेढा येथे नुकत्याच झालेल्या जनसंवाद सभेत सहकार मंत्र्यांसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसच्या अनेक जेष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असले तरी एक नेता सोलापूर जिल्ह्यात अलिप्तवादाचे धोरण स्वीकारत पुणे मुक्कामी मात्र पोटनिवडणुकीबाबत वेगळेच राजकीय चित्र रंगविण्यात व्यस्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे.             

स्व.आ.भारत भालके यांच्या निधनानंतर सहानुभीतीची मोठी लाट निर्माण झाली.त्यांच्या निधनास तीन महिन्याच्या कालावधी होत असतानाच पोट निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.अशातच आता राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मला चर्चेस बोलविले होते असे भाष्य समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना केल्यामुळे या दोन्ही तालुक्यात राजकीय चर्चेला ऊत आला असून स्व. आ.भालके यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारास उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस भगिरथ भालके याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे भाष्य केले होते तर सांत्वनपर सरकोली भेटीवेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी ”संस्थाचे अर्थकारण” जपले,टिकले पाहिजे,सक्षम राहिले पाहिजे असे ठामपणे सांगितले होते.व याचवेळी उपस्थितांच्या भावनिक सादेला प्रतिसाद देत तुमच्या जे मनात आहे तेच होईल अशी ग्वाहीही दिली होती.असे असले तरी राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे भावनिक राजकारण करणारे नेते नाहीत याचा अनुभव दस्तुरखुद्द आण्णा गटाने व विठ्ठल परिवाराने घेतला आहे.शरद पवार यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून पंढरपूर तालुक्यातील एक उदयोन्मुख नेता सहकार मंत्र्यांसह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत असून ”संस्थेचे” अर्थकारण वेगळे आणि राजकारण वेगळे हि भूमिका अनेक फाईली,रिपोर्ट आणि आक्षेप नोंदवत असल्याचे दिसून येत आहे.हे सारे पटवून देताना राजकारण विरहित भूमिका घेत असल्याने ‘विट्ठलची’ राष्ट्रवादीच्या वरिष्ठ वर्तुळत गांभीर्याने मोठी चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.अशातच मंगळवेढा येथील जनसंवाद सभेत सहकार मंत्र्यांसमोर गाऱ्हाणे मांडतांना समाधान आवताडे चेअरमन असलेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक आणि १९ हजार अक्रियाशील सभासदांचा मतदानाचा अधिकार याबाबत भाष्य केल्याने वेळ आल्यावर भुमीका जाहीर करण्याच्या तयारीत असलेले समाधान आवताडेही थेटपणे सक्रिय झाले आहेत. ”विठ्ठल” पेक्षा दामाजी कसा सुधृढ आहे हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील एक बडा नेता या कमी महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे समजते.            

   आगामी विधानसभा निवडणूक हि दुरंगी-तिरंगी-कि ऐनवेळी ”व्युहरचना” म्हणून पंढरपूरातून आणखी एक रंग यात मिसळणार हे पोटनिवडणुकीवेळी स्पष्ट होणार असले तरी ”तासगाव पॅटर्न” राबविल्यास थांबण्याची तयारीही ”दूरगामी” परिणाम लक्षात घेऊन ऐनवेळी काही संभाव्य उमेदवाराकडून संयुक्तरित्या दाखविली जाऊ शकते असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. समाधान आवताडेंना भाजपा आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी ”चर्चेचा” प्रस्ताव दिला असला तरी पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात तुर्तास तरी परिचारक हाच पक्ष आणि परिचारक गटास  ठोस विरोध करणाऱ्या नेत्याचा पक्ष असे दोनच पक्ष ”प्रभावी” असून पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात खऱ्या अर्थाने प्रभाव निर्माण करीत येथील जनतेसमोर सक्षम पर्याय म्हणून पाठबळ मिळविण्यासाठी ठराविक प्रसंगीच्या गाठीभेटी सत्राबरोबरच येथील सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे आणि विविध पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात प्रभाव असणाऱ्या विदुराच्या ”वि…दूर” नीतीपेक्षा सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक झालेल्या आवताडेंना मंगळवेढा तालुक्याप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील जनता बळ दिल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *