वीज बिल थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महावितरणने आता थकबाकीदारांना झटका देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात भांडूप परिमंडळातील 6 हजार 602 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे. वीज बिलाची थकीत रक्कम भरल्यानंतरच वीज जोडणी दिली जाईल अशी भूमिका महावितरणने घेतल्याने वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणच्या भांडूप परिमंडळात भांडूप, मुलूंड, ठाणे, नवी मुंबई, पेणचा समावेश आहे. येथील 1 लाख 63 हजार ग्राहकांकडे 1750 कोटी रूपये थकीत आहेत. सदर थकबाकीची रक्कम तत्काळ भरावी म्हणून महावितरणने संबंधित ग्राहकांना एसएमएस, दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्प करून वीज बिलाची थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यानंतरही ग्राहक वीज बिल भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याची गंभीर दखल घेत महावितरणच्या वीज बिल वसूली पथकाने परिमंडळाचे मुख्य अभियांता सुरेश गणेशकर यांच्या निर्देशानुसार थकबाकीदरांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तसेच त्यानंतरही ग्राहकांनी वीज बिले न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई आणखी तीव्र केली जाईल असा इशारा महावितरणने दिला आहे.
घरगुती ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी
भांडूप परिमंडळातील एपूण थकबाकी 1750 कोटी रूपये आहे. त्यापैकी सर्वाधिक 860 कोटी रूपये घरगुती ग्राहकांकडे थकीत आहेत. वाणिज्यक ग्राहकांकडे 349 कोटी रूपये तर औद्योगिक ग्राहकाडे 78 कोटी रुपये थकीत असून इतर गटातील ग्राहकांडे जवळपास 463 कोटी रूपयांची थकबाकी आहे.