राज्यात साखर कारखाने सुरू होऊन 4 महिने उलटून गेले. तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम न देता मोडतोड करून शेतकर्यांना रक्कम दिलेली आहे. तसंच गतवर्षीची एफआरपीची रक्कम अद्यापही काहींनी दिलेली नाही. या सर्व साखर कारखान्यांवर तातडीने साखर जप्तीची कारवाई करावी,’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
ज्या साखर कारखान्यांनी सन 2020-21 एफआरपीची रक्कम थकीत ठेवलेली आहे. त्या साखर कारखान्यांची थकीत एफआरपी ही महसुली देणे गृहीत धरून त्या साखर कारखान्यांच्या सर्व संचालक मंडळाला सरकारी थकबाकीदार समजून त्यांना साखर कारखान्यांच्या निवडणुकीत अपात्र करण्यात यावे, अशी मागणी देखील शेट्टी यांनी यावेळी केली. यावर गायकवाड यांनी हा मुद्दा बरोबर असून मी कायदेशीर बाबी तपासून घेऊन योग्य ती कारवाई करेन, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.