Uncategorized

सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसला ”गतवैभव” प्राप्त करून देण्याचे शिवधनुष्य धवलसिह मोहिते पाटील पेलणार ?

विशेष आर्टिकल राजकुमार शहापूरकर, संपादक -पंढरी वार्ता 

 

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नुकतेच एक अनपेक्षित पक्षांतर घडले असून अकलूजच्या प्रतापगडाचे मनसबदार धवलसिह मोहिते पाटील हे आज कॉग्रेसवासी झाले आहेत.”एक था टायगर” या चित्रपटाच्या नावाचा संदर्भ देत जेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने चर्चेस येतो तेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात  जे नाव  ठळकपणे डोळ्यासमोर येते ते म्हणजे स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांचे आणि कॉग्रेसवासी झालेले डॉ.धवलसिह मोहिते पाटील हे स्व.प्रतापसिहांचे पुत्र म्हणून जसे जिल्ह्यात ओळखले जातात तसेच एक धाडसी युवा नेता म्हणूनही त्यांनी आपली ओळख कायम केली आहे.जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी नेत्याने कार्यकर्त्याला आणि कार्यकर्त्याने नेत्याला दिलेला शब्द आणि निष्ठा किती महत्वाची होती हे पटवून देताना भल्या भल्याना शब्द पाळत नाही म्हणून भररस्त्यात अर्ध्या चड्डीवर नारायण नारायण करायची वेळ आलेली या जिल्ह्याने पहिली आहे ती देखील स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या कारकिर्दीतच.म्हणूनच म्हणूनच तर निवडणुकीच्या राजकारणात यशअपयशाचे गणित झिडकारून सर्वसामान्य जनता ज्या प्रमाणे राज ठाकरे हे नावयांची ओळख आहे तसेच स्व.प्रतापसिह हे नाव कायम स्मरणात राहिले आहे.मुंबई येथे कॉग्रेस प्रवेश केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक ग्रामीण भागातील आलेले युवा नेतृत्व म्हणून धवलसिह यांच्याकडे पाहिले जात असून २०१४ ते २०१९ या सत्ताबाह्य काळात सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसचा प्रभाव ओसरला,ज्यांना पक्षाने देशाचे गृहमंत्रीपद सोपवले,राज्यपालपद सोपवले त्या सुशीलकुमार शिंदे यांनाही दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले.आणि विविध तालुक्यात कॉग्रेस टिकून राहिली ती केवळ मोजक्या निष्ठावंतांच्या बळावर.२०१९ ला विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली.सोबत कॉग्रेसलाही महत्वपूर्ण मंत्रीपदे मिळाली.त्यामुळे जिल्हा कॉग्रेसमध्ये उत्साह वाढला असतानाच ज्या प्रमाणे पक्षीय पातळीवर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकतें आक्रमकपणे पक्षाचा प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न करीत असताना दिसून आले तितक्या आक्रमकपणे सोलापूर शहर सोडले तर ग्रामीण भागात कॉग्रेस केंद्र सरकार विरोधातील आंदोलनाशिवाय पक्ष बांधणीबाबत प्रभावी भूमिका पार पाडताना दिसून येत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.आता डॉ. धवलसिह मोहिते-पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याच्या ग्रामीण राजकरणात दबदबा असणारा चेहरा कॉग्रेसला मिळाला आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा वाढता दबदबा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले संकेत पाहता शिवसेनेला आगामी काळात जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून नव्हे तर स्वबळावरच वाटचाल करावी लागणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.                         
       एकेकाळी सोलापूर जिल्हा हा कॉग्रेसचा गड म्हणून ओळखला जात असे.१९८० आणि ९० च्या दशकात विधानसभा असो अथवा लोकसभा निवडणूक,जिल्हा परिषद असो अथवा सोलापूर महापालिका निवडणूक,जिल्हा बँक असो अथवा जिल्हा दूध संघ कॉग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले असून सोलापूर शहर आणि अक्कलकोट,द.सोलापूर व करमाळा मतदार संघावर सुशीलकुमार शिंदे यांचा प्रभाव तर उर्वरित विधानसभा मतदार संघ,जिल्हा बँक,दूध संघ आणि जिल्हा परिषदेच्या राजकरणात त्या वेळच्या एकसंध मोहिते पाटील परिवाराचा शब्द अंतिम मानला जात होता.आणि सोलापूर जिल्ह्यावरील याच कॉग्रेसच्या वर्चस्वाचे प्रणेते म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी ९ वर्षे राज्याचे अर्थमंत्रीपद सांभाळले,पुढे मुख्यमंत्रीही झाले,देशाचे गृहमंत्रीही झाले आणि राज्यपाल हे राजकरण विरहित पदही भोगले.सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात सुशीलकुमार शिंदे यांचा दबदबा कमी होण्यास सुरुवात झाली ती त्यांच्या सुविध्य पत्नी उजवलाताई शिंदे यांच्या लोकसभा निवडुकीतील पराभवानंतर.       

              १९९९ ला कॉग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थापना झाली.माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि जिल्ह्याच्या ग्रामीण राजकरणात कॉग्रेसचा प्रभाव ओसरू लागला.पुढे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आणि तत्पूर्वीच्या तीन वर्षात विजयदादा पासून दुरावलेले प्रतापसिह मोहिते पाटील हे दादांच्या विजयासाठी आक्रमकपणे सक्रिय झाले खरे पण या निवडणुकीतील पराभवानंतर अकलूज हा सोलापूर जिल्हाच्या राजकारणाची केंद्रबिंदू राहिला नाही आणि प्रतापगड आणि शिवरत्न यांच्यातील दुरावा वाढत गेला हे  उघड सत्य आहे.स्व.प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या निधनानंतर शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदासह प्रतापगडाचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी धवलसिह मोहिते पाटील यांनी सूत्रे हाती घेतली.आणि मोहिते पाटील परिवारातील दोन गटाचा संघर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात ठळकपणे निदर्शनास येऊ लागला.२००४ ला झालेल्या करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी ”करमाळा तालुक्यात ”मै हू ना” चे फलक झळकले आणि येथूनच खऱ्या अर्थाने प्रतापगडाचा दबदबा संपुष्ठात येण्यास सुरवात झाली.सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात राष्ट्रवादीच्या धाकट्या पातीचे मोहिते पाटील विरोधकांस मिळलेल्या खतपण्याच्या फटका सर्वाधिक सहन करावा लागला तो प्रतापगडास.   

 स्व.प्रतापसिह मोहिते-पाटील यांच्या निधनानंतर डॉ.धवलसिह मोहिते पाटील यांनी ”तोच” निडर आणि करारी बाणा अंगीकारत आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली.मात्र हे करत असताना गेल्या ५ वर्षात त्यांनी विविध पक्षाशी जवळीक साधण्याचा केलेला प्रयोग अयशस्वी ठरला असून शिवरत्न विरुद्ध प्रतापगड असेही निर्माण झालेले चित्र माळशिरस तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते-पाटील विरोधक म्हणून वावरणाऱ्या नेत्यांना पूर्णपणे आपले नेतृत्व स्वीकारण्यात डॉ.धवलसिह मोहिते पाटील कधीही संपूर्ण यशस्वी ठरले नाहीत.         

   आता त्यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एक ” प्रभावी आडनावाचा नेता”लाभल्याचा आनंद जरी खंबीर नेतृत्वहीन ठरलेल्या जिल्ह्याच्या ग्रामीणभागातील कॉग्रेसप्रेमींना झाला असला तरी सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात कॉग्रेसचा प्रभाव वाढविण्यासाठी ” साहेबांच्या” कृपेने नामधारी पदाधिकारी म्हणून मिरवीत ग्रामपंचातीवर देखील वर्चस्व नसलेल्या व निवडणुकीपुरता प्रकाश पाडत एरव्ही पक्षकार्यात ”उजेड” पाडण्यात अपयशी ठरलेल्या तसेच ”मोजक्या(पक्षांतर्गत विरोधक वगळून),नेहमीच्या,पक्षाचे सक्रिय सभासदही नसलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षाच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे ”कात्रणांच्या” बळावर ठसवून कॉग्रेसचा अवसानघात करणाऱ्याना जिल्ह्यातील व्यक्तिनिष्ठ पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत कॉग्रेस विचारधारा प्रमाण मानणाऱ्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे शिवधनुष्य पेलण्यात डॉ.धवलसिह मोहिते पाटील हे  यशस्वी ठरले तर  सोलापूर जिल्हा ग्रामीण कॉग्रेसमध्ये त्यांच्या नावाचा प्रचंड दबदबा वाढणार आहे.कदाचित यात ते यशस्वी ठरले तर विधानपरिषदेचे कॉग्रेसचे दावेदार म्हणूनही त्यांचा विचार होईल आणि १९८० आणि ९० च्या दशकाप्रमाणे जिल्ह्यात कॉगेसला पुन्हा सुगीचे दिवस येतील असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *