ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरीत असे पहिल्यांदाच घडले, बदली झाली म्हणून पेढे वाटले !

        पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बहुप्रतीक्षित बदली झाल्याचे वृत्त आज पंढरपूर शहर व तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकले आणि वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारून वैतागून गेलेल्या अनेक सर्वसामान्य नागिरकांनी आनंद व्यक्त केला असून त्याच बरोबर बळीराजा शेतकरी संघटना,कोळी महासंघ यांनी तर संत नामदेव पायरी परिसरात अक्षरश पेढे वाटून आपला आनंद साजरा केल्याचे दिसून आले.पंढरपूर तहसील कार्यालयासह विविध शासकीय विभागात दर दोन -तीन वर्षांनी नवे अधिकारी बदलून येतात,विहित कालावधी येथे कर्तव्य पार पडतात.यापैकी फार थोडे अधिकारी हे कर्तव्य तत्परता,सामान्य जनतेशी सहज संपर्क आणि विहित वेळेत सामान्य लोकांच्या कामे मार्गी लावण्याची पद्धती यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरतात.सामान्य जनतेमध्ये लोकप्रिय ठरतात तर काही अधिकऱ्याच्या कार्यपद्धितीचा सामान्य जनतेला प्रचंड त्रास होतो,यातूनच संतापाची भावना जनतेत निर्माण होते आणि त्याचे प्रतिबिंब म्हणून विविध राजकीय नेते,पक्ष पदाधिकारी,सामाजिक संघटना यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून दिसू लागते.पंढरपूरच्या तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्या पासून कार्यपद्धितीमुळे सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची अखेर बदली झाली असून एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीच्या वृत्तानंतर पहिल्यांदाच पेढे वाटले गेले.         
          पंढरपूरच्या तहसीलदार म्हणून पदभार स्वीकरल्यानंतर वैशाली वाघमारे यांच्याकडून वेगळ्या कार्यपद्धितीची अपेक्षा व्यक्त होत होती.मात्र पुढे हळू हळू जैसे थे परिस्थिती कायम राहिली.पर्यावरण विभागाच्या अतिशहाण पणाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू साठ्याचे लिलाव थांबले आणि रात्रीत चाळीस-पन्नास हजार रुपये मिळवून दिवसा हवा करणाऱ्याना सुगीचे दिवस आले.पंढरपूर तालुक्यातून भीमा नदी वाहत असल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावात  व पंढरपूर शहर परिसरात, वाळू चोरांचे मोठे जाळे निर्माण झाले.आणि कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने सुरु असलेला वाळू उपसा हा बातम्यांच्या रूपाने झळकू लागला.वाळू साठ्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेले तलाठीपद  हे निवासी पद आहे. ज्या गावात कर्तव्यवावर आहे तेथे राहणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी बिनधास्त वाळू चोरीचे प्रकार घडत होते.गेल्या वर्षभरात अवैध वाळू उपशावर झालेल्या कारवायांचा अभ्यास केला असता सर्वाधीक कारवाया या पोलीस प्रशासनाकडून झाल्याचे दिसून येते.याहून गंभीर बाब म्हणजे ज्या गावात पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारे वाहने त्याब्यात घेतली आहेत व गुन्हा नोंद केला आहे त्या वाहनांची माहिती पोलिसांकडून घेऊन अशा वाहनावर महसूल अधिनियमानुसार कारवाई करण्याकडे अनेक तलाठ्यांनी डोळेझाक केल्यामुळे अनेक वाहने हे महसूलच्या परस्पर कोर्टातून सोडवली गेल्यामुळे महसूल खात्यास लाखो रुपयांचा फटका बसला आहे.   
          श्रावळ बाळ निराधार योजना,विधवा परित्यक्त्या यांच्यासाठीच्या योजना,शेतकरी वर्गाच्या जमीन नोंदीची प्रकरणे,रस्त्याच्या वाद यासह सामान्य कष्टकरी जनतेचा मोठा आधार असलेल्या स्वस्त धान्य दुकानांवर निर्णयायक कारवाई आणि कार्यवाहीचे अधिकार तहसीलदार याना असतात. त्याच बरोबर शहर तालुक्यातील जनतेची शेकडो कामे तहसीलदार कार्यालयात असतात.आणि त्यामुळेच तहसील कार्यालय हे सर्वाधिक वर्दळीचे शासकीय कार्यालय म्हणून ओळखले जाते.मात्र येथे आल्यानंतर विहित वेळेत कामे झाली तर दुवा देत जाणारा सामान्य नागिरक जेव्हा हेलपाट्याने बेजार होतो तेव्हा त्यास वशिलेबाजी,सामाजिक अथवा राजकीय नेत्याकडे धाव घेणे किंवा चिरीमिरी देऊन कामे करून घेणे हेच पर्याय शिल्कक राहतात.आणि गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत पंढरपूर तहसिल कार्यालय हे टीकेचा धनी ठरले होते.सामान्य नागिरकच काय तर विविध पक्षाचे नेतेमंडळी आणि सामाजिक कार्यकतें यांनी अनेकवेळा तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या कार्यपध्दतीबद्दल टीकेची झोड उठविली होती.जिल्हाधिकाऱ्यांपासून ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यत त्यांच्या बदलीसाठी पाठपुरावा केला होता.लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेला स्वस्त धान्य दुकानाचे धान्य जगण्याचा आधार होता.आणि शहर तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानांबाबत सामान्य नागिरक,संघटना,पक्ष पदाधिकारी यांनी तहसील कार्यालयाकडे तक्रार करून देखील त्याची फारशी दखल घेतली जात नाही याचा अनुभव आल्यामुळे अनेकांनी थेट जिल्हा पातळीवर पाठपुरावा केला होता तेव्हा कुठे कारवाई होताना दिसून आली.    
           तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या कार्यपध्दतीबद्दल अनेकांना आलेला कटू अनुभव,अनेकांनी या कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीचा पाढा खूप मोठा आहे आणि यावर निर्णायक अधिकारी म्हणून ज्यांची जबाबदारी होती त्यांनी कसे दुर्लक्ष केले याबाबत विविध पक्ष संघटना,पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेली टीका याचा इथे उल्लेख केला तर तो खूप मोठा विस्तार होईल पण एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर पेढे वाटून आनंद व्यक्त केला जाण्याचा प्रकार पंढरपुरात पहिल्यांदाच घडला आहे.आणि हि बाब पंढरपूरचे तहसीलदार म्हणून नव्याने पदभार स्वीकारणारे नवे तहसीलदार गाभीर्याने घेतील आणि जसे प्रांताधिकारी सचिन ढोले हे आपल्या कर्तव्यतत्परतेमुळे सामान्य जनतेचे आदरस्थान नव्हे तर हिरो ठरले आहेत त्या प्रमाणेच सामान्य जनतेला सन्मान देत आपुलकीने त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या त्यांच्या कार्यपद्धितीचा अवलंब करीत एक लोकप्रिय तहसीलदार म्हणून ” बदल” दाखवून देतील याच अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *