ताज्याघडामोडी

आभासी प्रयोगशाळा हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम पर्याय होय – डॉ. बिभास गुहा

आभासी प्रयोगशाळा हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम पर्याय होय – डॉ. बिभास गुहा
पंढरपूर – “आभासी प्रयोगशाळेच्या माध्यमातून लाखो प्राण्यांचे जीवन वाचविता येतात. प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांच्या निमित्ताने लाखो प्राण्यांचे विच्छेदन केले जाते. त्यावेळी त्या प्राण्यांची हत्त्या होत असते. त्यातून निसर्गातील जैव साखळीला थोडासा हादरा बसतो. मात्र सध्याच्या कोव्हीड १९ च्या परिस्थितीत प्रत्यक्षात विद्यार्थी प्रयोगशाळेत उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासासाठी ‘आभासी प्रयोगशाळा’ हा खूपच महत्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात.” असे प्रतिपादन पश्चिम बंगाल येथील नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ कलकत्ताचे प्रोफेसर डॉ. बिभास गुहा यांनी केले. 
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय वेब चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते. 
या चर्चासत्राचे उद्घाटन करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. के.आर. राव म्हणाले की, “विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थी व शिक्षकांनी शिक्षणाची प्रक्रिया अधिक सोपी केली पाहिजे. विज्ञान विभागातील जवळपास सर्वच विषय हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविले जावू शकतात. व्याख्यान पद्धती बरोबरच प्रात्यक्षिकेही अध्ययन अध्यापनातील महत्वाची प्रकिया आहे.”
या चर्चासत्राच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “सध्या कोव्हीड १९ या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव असल्याने शाळा महाविद्यालयात विद्यार्थी प्रत्यक्षात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांचे अध्ययनाचे कार्य हे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिके घेताना शिक्षकांना काही समस्यांचा सामना करावा लागत होता. या चर्चासत्रातील मार्गदर्शनाने या त्रुटी निश्चितपणे दूर होण्यास मदत होणार आहे. या पद्धतीचा वापर शिक्षकांनी केला पाहिजे.”
या चर्चासत्राचे प्रास्ताविक अंतर्गत महाविद्यालय सुधार समितीचे समन्वयक डॉ.अमर कांबळे यांनी केले. या चर्चासत्रास विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य व प्रोफेसर डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, अधिष्ठाता, प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, स्वायत महाविद्यालय समन्वयक डॉ. मधुकर जडल, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदींसह महाराष्ट्र, पश्चीम बंगाल, ओरिसा या राज्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे संयोजन गजानन गायकवाड यांनी केले. सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी पी.आर.गायकवाड, कु. एस.बी.तेली यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. समाधान माने यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *