ताज्याघडामोडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून आतापर्यंत अधिकाऱ्यांनी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त केले आहेत. यापूर्वी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण जप्त रकमेपेक्षा ही अधिक रक्कम आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ‘सार्वत्रिक निवडणुका २०२४ दरम्यान जप्त केलेली रक्कम ही देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात नोंदवलेली सर्वाधिक रक्कम होण्याच्या मार्गावर आहे,’ असे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

२०१९ मधील संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान ३ हजार ४७५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. मात्र २०२४ मधील निवडणुकीच्या मतदानाआधीच जप्त केलेली रक्कम याहून अधिक आहे. सर्वसमावेशक नियोजन, सहकार्य आणि एजन्सींकडून एकत्रित प्रतिबंधात्मक कारवाई, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि तंत्रज्ञानामुळे ही कारवाई शक्य झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *