पाऊस आला म्हणून आडोशाला थांबलेल्या तरूणाला चोर समजून मारहाण करण्यात आली. या मारहाणी तरूणाची मृत्यू झाला आहे. संजय प्रभाकर पवार असे मृत्यू पावलेल्या आदिवासी तरूणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
पाऊस आल्यामुळे संजय आडोशाला थांबला होता. यावेळी चोर समजून त्याला नागरिकांनी लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना फोनवर चोराला लोकांनी मारहाण केल्याची माहिती देण्यात आली. चंदणझिरा पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत तरूणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केला.
पवार यांच्या नातेवाईकांना मंगळवारी दुपारी घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी जालना शासकीय रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी मयत संजयचा भाऊ रामेश्वर पवार यांनी आपला भाऊ चोर नसून पाऊस आल्यामुळे तो आडोश्याला थांबला असताना त्याला मारहाण करून जीवे ठार करण्यात आल्याची फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, पोलिसांनी संशयित तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फिर्यादीनंतर विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. शहानिशा न करता कोणालाही चोर समजून मारहाण करणे चुकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.