ताज्याघडामोडी

‘मी जातेय’, नवऱ्याच्या पाया पडून खोलीत गेली, त्यानंतर पत्नीने केलं धक्कादायक कृत्य

मध्य प्रदेशमध्ये पत्नीने तिचं जीवन संपवल्याचा अजब प्रकार उघड झालाय. नवऱ्याच्या पाया पडून त्याची परवानगी घेऊन पत्नी घरात गेली, ती कधीही परत न येण्यासाठी. पत्नीच्या अशा वागण्याची पतीला जरासुद्धा कल्पना नव्हती. घटनेमुळे पती व इतर नातेवाईकांना धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातल्या ररी गावात ही अजब घटना घडली. थंडीमुळे घराबाहेर ऊन खात बसलेल्या नवऱ्याजवळ पत्नी आली. त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, ‘मी जाते.’ त्यानंतर पत्नी घरात गेली. थोड्या वेळाने नवरा आत गेला, तर पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बाजूलाच रक्तानं माखलेला चाकूही पडला होता.

ररी गावात राहणाऱ्या रमेश शर्मा यांना घडलेल्या प्रकाराबद्दल जराही कल्पना नव्हती. पत्नी पाया पडून जगातून कायमस्वरूपी जाण्याची परवानगी मागतेय, याचा त्यांना अंदाज नव्हता. शनिवारी (27 जानेवारी) रमेश शर्मा घराबाहेर ऊन खात बसले होते. तेव्हा घरातून त्यांची पत्नी आशादेवी बाहेर आली. 42 वर्षांची पत्नी आशा देवी यांनी नवऱ्याला पाया पडून ‘मी आता जाते’ असं म्हटलं. यावर रमेश यांना काही विशेष वाटलं नाही. त्यानंतर आशा देवी घरात गेल्या. काही वेळानंतर रमेश हेही घरात गेले, मात्र समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

आशादेवी यांनी घरात आल्यानंतर स्वतः चाकूने गळा कापून घेऊन स्वत:ला संपवलं. नातेवाईकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली, तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आशा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा यांना टीबी झाला होता. बऱ्याच काळापासून आजारी असल्यामुळे त्यांची मानसिक स्थितीही नाजूक झाली होती. या आधीही त्यांनी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं होतं. मात्र या वेळी आशा यांनी त्यांचा जीव वाचवण्याची संधी कोणालाही दिली नाही. यावेळी हाताची नस न कापता त्यांनी गळ्यावरूनच चाकू फिरवला. आशा देवी असं काही करतील, याची त्यांच्या नातेवाईकांना कोणालाच कल्पना नव्हती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शारीरिक व्याधींमुळे बराच काळ ग्रस्त असलेल्या लोकांना मानसिक ताण व अस्वास्थ्याचा सामनाही करावा लागतो. अशा वेळी त्यांना समुपदेशनाची गरज असते. ते वेळीच मिळालं नाही, तर प्रसंगी अशा घटनाही घडू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *