खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही भयंकर घटना अहिरे (ता. खंडाळा) येथे घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अहिरे (ता. खंडाळा) येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे आणि संशयित ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे यांची शेती आहे. या दोघांमध्ये शेताच्या बांधावरून नेहमी वाद होत होते. शनिवार, दि. २३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे याने शेतीचा बांधा कोरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, मोहन धायगुडे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. यावेळी संशयित आरोपी नोन्या याने मोहन यास शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नसतो, अशी धमकी दिली होती. दरम्यान, या घरगुती वादाच्या घटनेची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात केली नव्हती.
यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे आणि मोहन यांची गावाच्या पारावर भांडण झाली. या भांडणात ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याने मोहन याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर उर्फ नोन्याने धायगुडे याने मोहन यास स्वत:च्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी खंडाळा बाजूकडे घेऊन गेला. या घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना मिळताच त्यांनी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याला रस्त्यामध्ये ताब्यात घेतले. या घटनेची फिर्याद वैशाली मोहन धायगुडे यांनी दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.