बहुतांश लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचा अवलंब करतात. भारतीय बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जासारखी असुरक्षित कर्जे जारी करतात.
मात्र, आता क्रेडिट कार्ड मिळवणे आणि वैयक्तिक कर्ज घेणे कठीण होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने काही नियम कडक केले आहेत. RBI ने बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या असुरक्षित कर्ज पोर्टफोलिओशी संबंधित नियम कडक केले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गेल्या गुरुवारी बँकांच्या असुरक्षित कर्जाबाबत एक प्रकाशन जारी केले. मध्यवर्ती बँकेने यात म्हटले आहे की आता बँका आणि बिगर बँकिंग कंपन्यांना असुरक्षित कर्ज पोर्टफोलिओसाठी अधिक भांडवल बाजूला ठेवावे लागेल. हे भांडवल पूर्वीपेक्षा 25 टक्के अधिक असेल. यापूर्वी 100 टक्के भांडवल वेगळे ठेवले जात होते, आता बँका आणि बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना 125 टक्के भांडवल वेगळे ठेवावे लागेल. समजा एखाद्या बँकेने 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज दिले, तर आधी फक्त 5 लाख रुपये बाजूला ठेवावे लागतील, परंतु आता बँकेला 25 टक्के जास्त म्हणजे 6 लाख 25 हजार रुपये बाजूला ठेवावे लागतील.
अलीकडच्या काळात वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी, असुरक्षित कर्जांनी बँकेच्या कर्जाच्या वाढीला मोठ्या फरकाने मागे टाकले. विशेषतः क्रेडिट आणि वैयक्तिक कर्जामध्ये असामान्य वाढ दिसून आली. वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डची संख्या वाढली असतानाच, थकबाकीची प्रकरणेही वाढली आहेत आणि वेळेवर पैसे भरण्याची प्रकरणे कमी झाली आहेत. अशा परिस्थितीत आरबीआयने या प्रकारच्या कर्जाचे नियम कठोर केले आहेत.