ताज्याघडामोडी

मराठा समाजाची साधी, सरळ, सोपी गोष्ट अवघड करून ठेवली; बच्चू कडू यांचा हल्लाबोल

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे वातावरण तापले आहे. याबाबत अनेक नेते आणि पक्ष प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याबाबत आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया देत मिंधे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची साधी, सरळ, सोपी गोष्ट होती; ती आता अवघड करून ठेवली गेली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा ओबीसी म्हणून द्या नाही तर कुणबी आहेत, असे समजून परिपत्रक काढायला काहीच हरकत नाही, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. शेतीविषयक धोरण ठरवले गेले, तर आरक्षणाची गरजही भासणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.

कडू म्हणाले की, मराठा हे मुलखाचे नाव आहे. जातीचे नाव नाही. मराठा हे कुणबीच होते. शिवाजीमहाराजांच्या काळात मराठे आले म्हणजे ‘अठरापगड जातीचे एकत्र लढणारे सैनिक आले’ असा अर्थ होता. मराठा हे ध्येयाचे व गर्वाचे नाव होते. कुणबी म्हणजे शेतकरी होते. आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे, सर्वाना शिक्षण मोफत मिळाले. शेतीवर भर दिला. गावातील तरुणांना ताकत दिली, तर तो तुमच्याकडे आरक्षण मागायला येणार नाही. आरक्षण फेकून देईल, असेही त्यांनी सांगितले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर भंडारा उधळणाऱ्यांना मारहाण झाली, याकडे लक्ष वेधले असता आमदार कडू म्हणाले, की आंदोलकांना गुन्हे दाखल होणे नवीन नाही. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. माझ्यावर 350 गुन्हे आहेत. पोलिसांच्या काठीने आमचे पाय तुटले. आंदोलन म्हटले की हे होणारच. तुम्हाला कोणी आंदोलन केले म्हणून पुरणपोळी देणार नाही. हे सहन केले पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व आमदारांकडून त्यांचे म्हणणे काय आहे याबाबत दोन पानी पत्र मागवा, मते मागवा अन्यथा जो समाज आम्हाला भेटेल त्याबद्दल आम्ही गोड गोड बोलतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *