मुंबई : राज्यात आज (28 जून) कोरोना आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. पण यामध्ये आता घट झालेली आहे. त्यामुळे राज्याला थोड्या प्रमाणात काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 727 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आजची आकडेवारी ही कालच्या तुलनेत 2 हजारांनी कमी आहे. 27 जूनला राज्यामध्ये 9 हजार 974 रुग्ण सापडले होते.
दिवसभरात किती रुग्ण बरे?
गेल्या 24 तासांमध्ये 10 हजार 812 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वधारला आहे. हा दर आता 95.99 टक्क्यांवर पोहचला आहे.
किती जणांचा मृत्यू?
रुग्णसंख्येच्या घटीसह मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. दिवसभरात 101 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा आता 2.1 टक्के इतका झाला आहे.