Uncategorized

डॉ.रोंगे सर हे तंत्रशिक्षणातील कर्मयोगी -एआरए चेअरमन जे.पी.डांगे

स्वेरीमध्ये आयएएस जे. पी. डांगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांच्या मनातील तंत्रशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणारे स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे सर हे विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देण्यासोबतच विविध अद्ययावत उपक्रम राबवत आहेत. हा एकप्रकारे कर्मयोग आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याप्रमाणे डॉ.रोंगे सरांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे त्यामुळे डॉ.रोंगे सर हे तंत्रशिक्षणातील ‘कर्मयोगी’ आहेत असे मी मानतो. शिक्षकांच्या परिश्रमपूर्वक ज्ञानदानामुळे विद्यार्थ्यांचा परिक्षांमधील रिझल्ट सर्वोत्तम लागतो. जेंव्हा नेतृत्व उत्तम असते तेंव्हा विद्यार्थ्यांना अधिक यश प्राप्त होते. स्वेरीतील तंत्रशिक्षण हे प्रगतीपथावर आहे. अभियांत्रिकीच्या माध्यमातून अवजड मशिनरी, मोठमोठ्या इमारती, रेल्वे, मोबाईल, रस्ते यांच्या माध्यमातून वाढते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि त्यातूनच विकास साधला जात आहे. प्रगत शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडत असतात. स्वेरीत तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्याचे आदर्श नागरिक घडत आहेत.’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य सचिव व महाराष्ट्र राज्याचे अॅडमिशन रेग्युलेटिंग अॅथोरीटीचे चेअरमन जे. पी. डांगे (आयएएस) यांनी केले.
स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजिलेल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव व महाराष्ट्र राज्याचे अॅडमिशन रेग्युलेटिंग अॅथोरीटीचे चेअरमन जे. पी. डांगे (आयएएस) हे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना स्वेरीच्या वाटचालीतील महत्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकला. विद्यार्थी केंद्रीत निर्णय प्रक्रिया कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे हे आहेत.’ असे सांगून भारतीय प्रशासकीय सेवेत बहुमोल योगदान दिलेले माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे यांच्या कार्याचा गौरव केला. आपल्या संदेशामध्ये डांगे यांनी ‘विद्या विनयेन शोभते’ असे सांगून विद्यार्थ्यांना करिअर बाबत शुभेच्छा दिल्या. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी चे सोलापूर रीजनचे प्रमुख डॉ.काटे म्हणाले की, ‘यशस्वी विद्यार्थ्यामागे शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्वाचे असते. योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून शिक्षकांनी ज्ञानदान करावे.’ यावेळी बी.फार्मसीचे डॉ. वृणाल मोरे, डी. फार्मसी चे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी व पदविका) तसेच कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) या चारही महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *