Uncategorized

वाचन करणे हाच अभ्यासाचा आत्मा आहे -अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

 

पंढरपूर (दि.04):-  विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना वाचन करणे ही प्रक्रिया महत्वाची आहे. वाचनाचर आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. अशा वाचनामुळे आपले विचार अगदी निर्भीडपणे आपण मांडू शकतो. असे मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना केले.

महसूल सप्ताहनिमित्त युवा संवाद कार्यक्रमातर्गंत यश पॅलेस येथे विद्यार्थ्यांसाठी  स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन व युवकांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, अपर तहसिलदार तुषार शिंदे, भुमिअभिलेख उप अधिक्षक अभिषेक सोनार, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पी.के.कोळी,  निवडणुक नायब तहसीलदार वैभव बुचके  पुरवठा निरीक्षण अधिकारी शितल कन्हेरे तसेच महाविद्याचे प्राचार्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी अपर जिल्हाधिकारी  तुषार ठोंबरे म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना आपल्याला अनेक घटकांवरील विविध पुस्तकांच अगदी सखोल वाचन करावे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच विविध नियतकालिकं, वर्तमानपत्र, अहवाल यांचंही वाचन स्पर्धा-परीक्षांच्या अभ्यासात महत्वाचं ठरते. परिणामी आपल्या वाचनाचा वेग व कार्यक्षमता अशा दोन्ही गोष्टी आपल्या यशामागे महत्वाच्या ठरतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात यशवंत होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र आत्मसात केले पाहिजे. केवळ उद्या परीक्षा म्हणून आदल्या दिवशी रात्रभर अभ्यास करून चालणार नाही. तर प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करून नियमित अभ्यास केला पाहिजे.

स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेचे प्रमाण आज वाढल्याचे आपणास दिसून येते. तरी  अजूनही स्पर्धा परीक्षांबाबत दिशाहीन व अजागरूक असा मोठा वर्ग पण पाहावयास मिळतो. म्हणुनच त्यांना मार्गदर्शनाची  गरज असून स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सुत्रबध्द व शिस्तबध्द पध्दतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यास परिणामक करण्यासाठी वाचनाचा वेग वाढवला पाहिजे व त्याचे आकलनही झाले पाहिजे. त्याचबरोबर भाषेवरही प्रभुत्व असणे आवश्यक आहे. असेही अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी यूपीएससी, एमपीएससी,  सरळ सेवा भरती परीक्षेबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन  विविध उदाहरणे देऊन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *