ताज्याघडामोडी

आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीला यश

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याने अनेक शेतकरी व पशुपालक पाण्याअभावी अक्षरशः हवालदील झाले आहे. दक्षिण भागाच्या सदर गावातील नागरिकांनी या योजनेचे पाणी सोडण्याबाबत आमदार आवताडे यांच्याकडे मागणी केली होती. या भागातील जनतेच्या सदर मागणी अन्वये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणीटंचाई असलेल्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व तलाव, बंधारे पाण्याने भरून देण्याबाबत आमदार आवताडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग सांगली म्हैसाळ कालवा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. आमदार आवताडे यांच्या या पत्राची दखल घेऊन संबंधित विभागाकडून या योजनेचे पाणी संबंधित गावांना सोडण्यात आले आहे.
या पत्रामध्ये आमदार आवताडे यांनी नमूद केले होते की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये गावभेट दौऱ्यानिमित्त अनेक गावात दौरा करत असताना पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची खूप मोठ्या टंचाईला या भागातील जनता सामोरे जात आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने अनेक शेतकरी व पशुपालक आपले पशुधन जगवण्यासाठी चार ते पाच हजार रुपये प्रति टन या दराने उसाचा चारा दुसऱ्या तालुक्यातून आणत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी पशुपालकांसाठी ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. आ आवताडे यांनी या सर्व बाबींचा सखोल पद्धतीने विचार करून या योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावे अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांना केली होती.
या भागातील जनतेचा पाणी प्रश्न व आमदार आवताडे यांच्या मागणीचा रेटा लक्षात घेऊन या योजनेचे पाणी तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व ओढ्यावरील सिमेंट बंधारे भरून घेण्यासाठी वितरिका क्रमांक – २ द्वारे पाणी उपलब्ध सोडण्यात आले आहे. वाढत्या पाणीटंचाईच्या परिस्थितीशी संघर्ष करत असलेल्या या भागातील जनतेला या पाण्यामुळे पाणी प्रश्नाबाबत खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *