ताज्याघडामोडी

रविवारच्या सुट्टीदिवशी बेत आखला, पाच मित्र जमले अन् नदीवर गेले, तोल गेल्यानं होत्याचं नव्हतं..

राज्यात पावसानं हजेरी लावल्यानंतर पावसाळी पर्यटनाच्या निमित्तानं अनेक जण घराबाहेर पडत आहेत. धबधबा, तलाव, धरणे आणि नदी परिसरात गेल्यानंतर पर्यटकांकडून किंवा नागरिकांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यामुळं राज्यात दोन दिवसात विविध ठिकाणी अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात कन्हान नदीत मासेमारी करताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सावनेर तहसील अंतर्गत येणाऱ्या भानेगाव शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीत मासेमारी करताना पाच मित्रांपैकी दोन मित्रांचा तोल गेल्याने ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. संजयकुमार शाह (२०, रा. सिसवा, जिल्हा शिव, बिहार) आणि श्रवणकुमार शाह (२०, रा. खानापूर, बिहार) अशी या दोन बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांसह शेषनाग कुमार शाह (२२), अमित कुमार शाह (२३) आणि शैलेंद्र कुमार शाह (२८) रा. भानेगाव येथील वेकोलिच्या कोळसा खाणीत श्री हरी कृष्णा कन्स्ट्रक्शन कंपनीत बिहारचे पाच जण कामासाठी आले होते.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने हे पाच जण भानेगाव शिवारातील कन्हान नदीच्या काठावर मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असताना संजय कुमार आणि श्रवण कुमार या दोघांचाही तोल गेला आणि ते पाण्यात पडले आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ते वाहून गेले. इतर तिघांना पोहता येत असल्याने ते पाण्यातून बाहेर पडले. दोघेही वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.

माहिती मिळताच एसएचओ दीपक कंकरेडवार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने शोध सुरू केला. सायंकाळी अंधार पडल्याने शोध मोहीम मागे घेण्यात आली. खापरखेडा पोलिसांनी कामठी आणि सावनेर तहसील प्रशासनाला नोटिसाही बजावल्या आहेत. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असून एनडीआरएफ टीमची मदत घेतली जात आहे. दीपक कांकरेडवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *