कर्नाटकची राजधानी बंगळुरुच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. तरुणाला गंभीर अवस्थेत व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणाचां आधी अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शशांक असं तरुणाचं नाव आहे. शशांकचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. ही तरुणी शशांकची दूरची नातेवाईक होती. तिच्याच कुटुंबियांनी शशांकला जिवंत पेटवल्याचं त्याचे वडील रंगनाथ यांनी सांगितलं.
शशांक आर आर नगरचा रहिवासी आहे. तो एसीएस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत आहे. तो पहिल्या वर्षात शिकत आहे. शशांकच्या वडिलांनी त्याला महाविद्यालयात सोडलं. मात्र त्याचं लेक्चर रद्द झाल्यानं तो घरी परतण्यासाठी निघाला. बस थांब्याजवळ उभ्या असलेल्या शशांकला ७ जणांनी कारमध्ये खेचलं आणि कनिमिनिके टोल नाक्याजवळ नेलं. यानंतर सात जणांनी पेट्रोल टाकून शशांकला पेटवलं.
शशांकचं एका तरुणीवर प्रेम होतं. ती तरुणी आमची दूरच्या नात्यातील असल्याचं शशांकचे वडील रंगनाथ यांनी सांगितलं. ३ जुलैला शशांक तरुणीला भेटायला तिच्या घरी गेला होता. दोन्ही कुटुंबियांनी या भेटीला आक्षेप घेतला. यानंतर काही दिवसांनी, १० जुलैला तरुणीचे आई वडील शशांकच्या घरी आले. त्यांनी शशांकला धमकी दिली. अपहरणकर्त्या सात जणांपैकी एकाची ओळख पटली आहे. तोच मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचं नाव मनू असून तो शशांक आणि तरुणीचा काका आहे.
शशांक आणि तरुणीचे प्रेमसंबंध वर्षभरापासून होते. हे प्रकरण संवादातून शांतपणे सोडवू, असं रंगनाथ यांनी मनू यांना सांगितलं होतं. मात्र त्यांनी शशांकला धमकी दिली. पेट्रोल टाकून तुला पेटवून देईन, अशा शब्दांत मनू यांनी शशांकला धमकावलं होतं. या प्रकरणी गृहमंत्री परमेश्वर यांनी अहवाल मागवला आहे. आरोपींना लवकर अटक करण्यात येईल. त्यांना कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.