राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही अद्याप चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव यावरून मी हे सांगत आहे असंही प्रकाश सोळुंके म्हणाले. बीडच्या माजलगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
प्रकाश सोळंके पुढे बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर भाजप महाराष्ट्रात काही ना काही चमत्कार करेल. त्यामुळे अजित दादांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही काहीतरी शिजत असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिले आहेत. यामुळें पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळुंके म्हणाले, की सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे, असं होणार तसं होणार, ते बोलणारा थांग पत्ता लागून देत नाही, ते काय होणार ? पण होणारचं आहे, जे व्हायचंय ते होणारचं आहे. महाराष्ट्रात जी चर्चा आहे ते होणारचं आहे, त्यांच्याबद्दल कुणी मनामध्ये शंका आणू नये.