“महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली पिकं आणि फळं भुईसपाट झाली आहेत. त्यातच आता पुढच्या काही तासात महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पुणे आणि रायगडच्या घाट परिसरात पुढच्या दोन तासात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसंच बऱ्याच भागांमधील हवामान ढगाळ राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाने वर्तवला आहे.
राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसंच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. या दृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.