ताज्याघडामोडी

कसब्यातील निकालानंतर शरद पवारांचं मोठं भाकीत; आगामी निवडणुकांवर बोलले…

‘भाजपला कसब्यात केवळ दोन ठिकाणी अधिक मतं मिळाली. नाही तर कसब्यात सरसकट मतं रवींद्र धंगेकरांना मिळाली आहेत. हा एक बदल आहे. आणि हा बदल पुण्यात होतोय. याचा अर्थ नागरिकांना बदल हवा आहे, यातून हे स्पष्ट होऊ लागलं आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होईल’, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

बारामती येथील गोविंद बाग येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांना हात घातला. ‘नागालँडमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादी हा दोन नंबरचा पक्ष झाला असून येथील जनतेने दाखवलेल्या विश्वासाने हे करणं शक्य झालं आहे. स्थानिक नेत्यांनी चांगली मेहनत घेतली. मतांची चांगली टक्केवरी पाहायला मिळत आहे. उमेदवारांना चांगली मतं मिळाली’, असं शरद पवार यांनी सांगितलं.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये १२ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मतं घेणारा पक्ष ठरला आहे. सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे आहे. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी वाधवान यांना नागालँडमध्ये पाठवले आहे. तिथे काय करावं यासंबंधीची माहिती येईल आणि त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ’, असं सांगत शरद पवार यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले.

‘बदलाचं वातावरण तयार होताना दिसत आहे. सध्या झालेल्या पदवीधर निवडणुकांमध्ये जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकही जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं आहे. निवडणुकीत सत्तेच्या वापर दिसून आला. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही. ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणं योग्य नाही. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचं चित्र बदलत आहे’, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *